कोल्हापूर : फुकट्या वीज वापरामुळे महावितरणवर वीजभाराचा ताण नाहक वाढलेला आहे. सांगली व कोल्हापूरच्या विटा, जत , कडेगाव,आटपाडी, तासगाव, मिरज ग्रामीण,इस्लामपूर, आष्टा, गडहिंग्लज, इचलकरंजी या भागातील ५४३ आकडेबहाद्दरांसह मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या वीज चोरांवर एकाच दिवशी कारवाई करीत महावितरणने वीज यंत्रणेवरील अतिरिक्त भार उतरविला आहे. त्यामुळे वीज उपलब्धतेत वाढ होऊन भारनियमन परिस्थिती हाताळण्यासाठी मदत झाली आहे.
वाढत्या वीज मागणीची गरज भागविताना महावितरण वीज उपलब्धतेचा ताळमेळ घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यात वीजचोरांनी चांगलाच खोडा घातल्याचे वीजचोरीविरुद्धची मोहिम कडक केल्यानंतर लक्षात येते आहे. राज्यात महावितरणने वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. ही मोहिम वीज यंत्रणेला दिलासा देणारी ठरत आहे. लाखों विजेच्या युनिटचा फुकटात होणारा वीज वापर यामुळे उघडकीस येतो आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही भागात आकडे टाकून वा अनाधिकृत वीज वापर करण्याचे प्रमाण असल्याचे आढळून येते आहे. कोल्हापूर ग्रामीण विभागातील कोडोली , फुलेवाडी या भागात ११२४ ग्राहक अनाधिकृत वीज वापर करताना आढळून आले आहेत. इचलकरंजीला अब्दुललाट येथेही वीज चोऱ्या आढळल्या आहेत. वीजचोरी कराल तर खबरदार हाच विजचोरांना महावितरणचा इशारा आहे. महावितरण यंत्रणेतील सर्व अधिकारी -कर्मचारी वीज चोरीविरुद्धची मोहिम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत.कार्यकारी अभियंता श्री. संदिप सानफ, श्री.संतोष कारंडे, श्री. विनायक इदाते, श्री. अप्पासो खांडेकर, श्री.सौरभ माळी श्री. दिपक पाटील, श्री. विजयकुमार आडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम सुरू आहे. तेंव्हा वीज चोरीला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.वीज चोरी करणार नाही आणि करू देणार नाही, हा निर्धार करूया.