मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन पेट घेऊ लागले असून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे. २५ ऑगस्ट रोजी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले, “मी सरकारही पाडू शकतो. आमची मागणी आजची नाही, चार महिन्यांपूर्वीच तारीख जाहीर केली होती. मात्र सरकारने आडमुठेपणा केला. आता शांत बसणार नाही.”
२७ ऑगस्टपासून “चलो मुंबई मोर्चा” सुरु होणार असून, २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर जरांगे आमरण उपोषणास बसणार आहेत. आरक्षणाच्या मागणीवर ठाम भूमिका घेत, त्यांनी सरकारसमोर दोन दिवसांची मुदत ठेवली आहे.
जरांगे म्हणाले :
“आम्हाला संविधानात बसणारे आरक्षण हवे आहे. ते दिल्यास आम्ही मुंबईत येणार नाही.”
“फडणवीस साहेब, ओबीसी तुमचे आहेतच… पण आरक्षण दिल्यास मराठेही तुमचे होतील.”
“मराठा आणि कुणबी एक असल्याचा जीआर काढा, अन्यथा मागे हटणार नाही.”
त्यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवत विचारले की, “शिंदे सरकारनेच समिती नेमून ५८ लाख नोंदींचा अहवाल दिला. मग कायदा पारीत का होत नाही? आधार मिळूनही आरक्षण का रोखले जाते?”
जरांगेंनी सर्व मराठा समाजाला आवाहन केले की, “राज्यातील कामे बंद करा, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक सर्वांनी लढ्यात सामील व्हा. जगाच्या इतिहासात असा उठाव पुन्हा होणार नाही. मराठा समाजाने एकजुटीने मुंबईकडे मोर्चा वळवावा.”




