मिरज : मिरज पूर्व भागातील तीव्र पाणीटंचाईची गंभीर दखल घेत म्हैसाळ योजनेचे आवर्तन आजपासून सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांवर ओढवलेल्या संकटाचे गांभीर्य समजून संबंधित विभागाशी तातडीने समन्वय साधल्याची माहिती आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिली.
भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव पाटील, बेडगचे सरपंच उमेश पाटील, मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार तत्काळ कार्यवाही करत आवर्तन सुरू करण्यात आले.
आवर्तन सुरू झाल्यामुळे मिरज पूर्व भागातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांची होणारी हानी थांबण्यास मदत होईल. आगामी दिवसांत सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा अधिक नियमित व सुरळीत होण्याची शक्यता आहे.
“शेतकरी हा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्यांच्या अडचणींना तात्काळ प्रतिसाद देणे हे माझे कर्तव्य आहे,” असे आमदार खडे यांनी सांगितले. भाजपा नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेत आली असून पुढेही शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.




