इंदूर-पुणे बसला अपघात 13 ठार,15 जणांना वाचविण्यात यश
धार: मध्य प्रदेशच्या धारमध्ये बसला मोठा अपघात झाला. इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या बसमधून ५५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. ही बस इंदूरमधून पुणेसाठी निघाली होती. नर्मदा नदीच्या पुलावरुन ही बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली आहे.
ही बस सकळी साधारण ८ वाजता इंदूवरुन निघाली. आग्रा-मुंबई महामार्गावर हा अपघात झाला. हा रस्ता इंदूर महाराष्ट्राला जोडतो. अपघात ज्या ठिकाणी झाला तिथून इंदूर ८० किलोमीटर अंतरावर आहे. ज्या पुलावरुन ही बस कोसळली तो पूल धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) आणि अर्धा खलटाका (खरगोन) येथे आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
या बसला अपघात ज्या ठिकाणी त्या ठिकाणापासून १२ किलोमीटर आधी त्या बसमधील प्रवासी एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले होते. यावेळी या बसमधील १२-१५ प्रवाशांनी चहा घेतला. बाकीचे प्रवासी बसमध्ये होते. या बसमध्ये साधारण ३० ते ३५ प्रवासी बसमध्ये होते असा अंदाज हॉटेल मालकाने व्यक्त केला आहे.
हा अपघात का झाला याच्या दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पुलावरचा मोठा खड्डा चुकवताना हा अपघात झाला असावा किंवा ओव्हरटेक करत असताना पुलाचे रोलींग तुटून ही बस खाली कोसळली असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. या अपघातात आता मृतांचा आकडा वाढणार असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.