राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरु आहे. जत येथे ही धनगर समाजाचे बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत. आज त्यांनी रास्तारोको केल्याच्या पार्श्वभूमीवर सदर आंदोलनात स्वतः सहभागी होत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाठिंबा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची आणि या समाजाला न्याय देण्याची प्रमुख मागणी केली असल्याचे देखील यावेळी नमूद केले.
१९५६ च्या अनुसूचित जाती/जमाती यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर “धनगड” असा उल्लेख झाल्यामुळे गेल्या ६८ वर्षांपासून धनगर समाज हा संविधानिक हक्कांपासून वंचित राहिला आहे. प्रत्यक्षात “धनगड” नावाची कोणतीही जमात या देशात किंवा जगात अस्तित्वात नाही. पत्रात यासंबंधी प्रमुख मुद्दे मांडण्यात आले असून धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर आगामी काही दिवसांत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू अशी ग्वाही उपस्थित सर्वांना दिली.