आष्टा : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रवीण माने यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर तीव्र टीका केली. “लाडकी बहीण योजना सामान्य महिलांसाठी मांडली असताना तिचा वैचारिक विरोध करणे चुकीचे होते,” असे तटकरे म्हणाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय बहुजन समाजाच्या सर्वांगीण हितासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सभेला जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, रणधीर नाईक, डॉ. सतीश बापट, निवास पाटील, संजय बेले, अमोल पडळकर, भगवान ढोले, सयाजी मोरे, लता पडळकर, धैर्यशील मोरे, उदय कुशिरे, पोपट शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, “आष्टा नगरपरिषद चालवण्यासाठी स्थानिक नगराध्यक्ष गरजेचा आहे. सांगलीतून चालवण्याचा काळ संपला. चाळीस वर्षे सत्तेत राहूनही पेठ–सांगली रस्ता न होणे ही मोठी कमतरता आहे.” विकासाचे आश्वासन देणाऱ्यांकडे पाच कोटींचा फंड असून ५७ गावात तो कसा देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सभेच्या शेवटी खासदार तटकरे म्हणाले, “प्रवीण माने हे २४ तास एटीएमसारखी सेवा देणारे नेतृत्व आहे. आष्ट्याच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन अटळ आहे. उद्योग, महिला स्वावलंबनाचे नवे मार्ग या शहरात उघडणार आहोत.”




