निस्वार्थ भावना

0
3



heavy rain in pune city | २५ जूननंतर सर्वदूर ...


       श्रावणात घन निळा बरसला, म्हणत श्रावण मासाच्या स्वागतास धरती सज्ज झालेली आहे. आकाशातून कोसळणाऱ्या श्रावण सरीत चिंब भिजण्यासाठी आतुर झालेली आहे. आकाशात दाटून येणारे काळे मेघ मनातही कधी दाटून येतात हे कळत देखील नाही.


                             एक अनामिक हुरहूर, मनी उठते काहूर.
                       दाटते  उरी जे क्षणभर, कोसळे ते बनुनी जलधर.


    श्रवणाचे वर्णन करण्या शब्द अपुरे पडावे असा याचा महिमा आहे. अनेक कविकल्पना आणि कथांचा उगम याच्या आगमनाने होतो. वातावरणात जसा ऊन सावल्यांचा खेळ चालतो तसाच मनातही प्रेम, विरह, दुःख, ओढ अशा अनेक भाव भावनांचा खेळ सुरु होतो. आपल्या हि नकळत आपण त्यात ओढले जातो. अशीच एक गोड भावना म्हणजे प्रेम.प्रेमावरील अनेक सुंदर रचना या श्रावणातच स्फुरल्या असाव्यात असे वाटल्यास वावगे ठरू नये.


         “प्रेमाला उपमा नाही , हे देवाघरचे देणे,” प्रेम हा शब्द उच्चारायला जेवढा गोड वाटतो तेवढीच त्या शब्दामागची भावना हि तितकीच सुंदर असते. प्रेम म्हणजे प्रियकर प्रेयसी मध्ये असते तेच प्रेम नाही, तर आई वडिलांचे आपल्या लेकरांवर असते ते हि प्रेमच. बहीण भावाचा आपसातील जिव्हाळा,माया म्हणजेही प्रेम,घरात पाळलेले मुके प्राणी ज्या मायेने,विश्वासाने आपल्यावर विसंबतात ते प्रेमामुळेच, आणि वनस्पती प्रेमी जीवापाड झाडांना जपतात काळजी घेतात ते सुद्धा प्रेमच असते. शिक्षकांचे आपल्या चिमुकल्यावर असते तेही प्रेमच ,तर मैत्रिणीतील आपसातील जिव्हाळा म्हणजेही प्रेमच.


      प्रेमाची रूपे आणि नावे अनेक असली तरीही भावना मात्र सारखीच असते, ती म्हणजे आपलेपणाची  जिव्हाळ्याची . प्रेम हे जगणं शिकवतं,मनाली उभारी देतं.सावित्री बाई फुले, रमाबाई आंबेडकर या थोर विभूतींनी अनाथ मुलांना प्रेमाचा मायेचा आधार दिला म्हणून त्यां मुलांचे जीवन घडले.


   मुन्ना भाईची प्यारवाली झप्पी असो कि कुणी मायेनं, प्रेमानं  डोक्यावरून फिरवलेला हात असो या प्रेमाचा ओलावा क्षणात मनावरचा ताण हलका करतो. मनापासून केलेलं प्रेम हे त्याग करणं, देणं शिकवते. एकतर्फी प्रेम  किंवा प्रेमभंगाच्या नावाखाली जे जीवघेणे हल्ले केले जातात ते बघून मन सुन्न होते. खरेच याला प्रेम म्हणावे का हा प्रश्न पडतो. आपल्याच प्रेमाच्या व्यक्तीला वाईट बोलणे, दुखावणे, किंवा त्या व्यक्तीच वाईट घडवून आणणे हे कसले आलेय प्रेम. हा तर निव्वळ स्वार्थीपणा आणि वेळकाढूपणा झाला. सहज मिळाले म्हणून केले अशा गोष्टीत प्रेम असूच शकत नाही. आणि ते कधीच टिकतही नाही.
   काही संवेदनशील मनाच्या व्यक्ती प्रेमात जास्त गुरफटत जातात. त्यांना समजून घेणारे प्रेम मिळाले नाहीच तर  हाती आलेल्या अपयशाने एकतर नैराश्यग्रस्त होतात, किंवा क्रूर आणि संवेदनशून्य बनतात. प्रेम हे कधीच लादलेले असू नये. प्रेमात जर घुसमट होत असेन तर त्यातून शांतपणे बाहेर पडणे नक्कीच चांगले. पण म्हणून प्रेम च वाईट असते असे अजिबात नाही.


    प्रेम जर जगणे व जगवणे शिकवत असेन तर आपण का आपल्या सोईनुसार त्याचे अर्थ बदलावे.? जमलंच तर फक्त निस्वार्थी प्रेम करावे. प्रेम हि ठराविक दिवशी किंवा ठराविक  काळासाठी सोय पाहून व्यक्त करण्याची भावना नाहीच. ती चिरंतन चालणारी एक सुंदर प्रक्रिया आहे.
     खरा तो एकची धर्म/ जगाला प्रेम अर्पावे. 



   मनिषा चौधरी

नाशिक..9359960429

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here