जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या पशुपालन व्यवसाय वाढीस लागला त्यामुळे तालुकाभर दुध व्यवसायाला चालना मिळाली.मात्र अन्नभेसळच्या भष्ट्र अधिकारी,उच्च शिक्षित तरूणाच्या जादा पैसे मिळविण्याच्या हव्याशाने दूध हे एका प्रकारे जीवनदायी अमृत; पण तेच आता विषसमान ठरू लागले आहे की काय, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील सुमारे 70 टक्के दूध भेसळीचे असल्याची धक्कादायक समोर येत आहे. अशा प्रकारचे हे भेसळीचे दूध वापरून इतर दुग्धजन्य पदार्थ, पाककृती बनवल्या जात असताना त्यांचाही किती विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. पोषक घटक म्हणून दुधाचा समावेश लहानांपासून ज्येष्ठांच्या आहारात केला जातो. त्यामुळेच त्याचे परिणाम सर्वव्यापी असतील, यात शंका नाही.
भेसळीच्या दुधामुळे क्षयरोग होऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यांसारख्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो. कॉस्टिक सोड्याच्या भेसळीमुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्यक असणारे ‘लायसिन’ हे अमिनो आम्ल शरीराला मिळत नाही. परिणामी, लहान मुलांच्या शरीरवाढीवर परिणाम होऊन त्यांची वाढ खुंटते. यामधील सोडिअमसारख्या घटकामुळे उच्च रक्तदाब व हृदय विकारासारखे आजार जडण्याचा संभव असतो. लॅक्टोज, साखर, ग्लुकोज तसेच पीठ आणि मैदा अशा प्रकारचे स्टार्च; मीठ, स्कीम मिल्क पावडरचीही भेसळ होते. अनेक ठिकाणी दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपड्यांची पावडर इत्यादींसारखे पदार्थ मिसळण्यात येतात.
कच्चे धारोष्ण दूध पिणे काय किंवा अगदी चहा-कॉफीपासून ते सुगंधी दूध अशा प्रकारे विविध चवीढवींनी युक्त पिणे काय, या सर्वांच्याच बाबतीत आता सावध राहावे लागेल. याचे कारण, ही परिस्थिती फक्त तबेल्यामधील दुधाची नाही, तर काही नामांकित ब्रॅंडच्या दुधाबाबतही हीच स्थिती आहे. त्यामुळे अनेक परिमाणे वापरल्याचा दावा करणाऱ्या काही नामांकित दूध कंपन्यांबाबतही संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे दूध पाहिल्यावर त्याची भेसळ कशी ओळखायची, याविषयी ठिकठिकाणी जागृती घडविण्याची, त्यासाठी काही उपक्रम राबविण्याची गरज आहे.
केवळ पैशाच्या लोभाने लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना ना कायद्याचा धरबंद, ना नैतिकतेचा. त्यांच्यावर जरब बसेल, अशा प्रकारची कारवाई आवश्यक आहे. अर्थात, हा केवळ तालुक्यातच नव्हे, तर राज्यभर पसरलेला ‘विकार’ आहे. हे प्रकार थांबण्याची कुठेही चिन्हे दिसत नाहीत. प्रशासनाने अनेक आश्वासने देऊनही भेसळीचे प्रकार थांबलेले नाहीत.संस्कृत साहित्यात हंसाला दूध आणि पाणी वेगळे करण्याचा नीर-क्षीर विवेक असल्याचे सांगितले जाते; पण अलीकडे भेसळीचे प्रमाण इतके वाढले आणि गुंतागुंतीचे झाले आहे, की आता राजहंसाची ती शक्तीदेखील पुरी पडणार नाही! त्यामुळेच सर्वांगीण उपाय योजण्याची गरज आहे.
तालुक्यातील जवळपास सर्व दुध संकलन केंद्रावर भेसळ
जत तालुक्यातील संकलन होणारे दुध किती व जनावरे किती यांची तपासणी होणे गरजेचे आहे. संकलन होणारे दुध उत्पादनापेक्षा कितीतरी जादा असल्याचे वास्तव आहे. तालुकाभर बनावट दुध तयार करण्याच्या फँकटऱ्या निर्माण झाल्या आहेत.अन्नभेसळच्या तालुक्याच्या कामगिरीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अर्थपुर्ण सहयोगाने सर्व काही सुरु आहे. काही दुध संघात अर्धे अर्धे टँकर बनावट दुध तयार केले जात असल्याची चर्चा आहे.





