जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात डेंग्यूसह साथीच्या आजाराने थैमान घातले असून तालुक्यात डेंग्यूचे शंभरावर रुग्ण आढळले आहेत. यातील अनेक रुग्णांवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. अन्य रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने साथीच्या रोगाचा फैलाव होत असतानाही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग असो की ग्रामीण रुग्णालय असो, वैद्यकीय सेवेबाबत ‘पहिले पाढे पंचावन्न’ असाच अनुभव सध्या जिल्हावासीयांना येत आहे.जत तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यूची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सर्व्हेतही आढळून आले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग डाराडूर असल्यानेच साथीच्या आजारावर नियंत्रण राहिलेले नाही. काही महिन्यांपूर्वीही जत शहरासह तालुक्यात अशीच परिस्थिती उद्भवली होती. तेव्हाही आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे साथीचा फैलाव वाढला होता. तीच स्थिती नव्याने परत उद्भवली आहे.
आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तत्काळ ठिकठिकाणी आढळून आलेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या गावांत घर टू घर सर्व्हे करणे गरजेचे आहे. ठिकठिकाणी धूर व औषध फवारणी करणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. सध्या शासकीय रुग्णालयात डेंग्यूच्या शेकड्याने रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वारंवार हवामानात बदल होत असल्याने या रुग्णाची संख्या वाढणार आहे. त्यावर तत्काळ उपाय योजना होत नाहीत. रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाचे आणि ग्रामीण रुग्णालयाचे ‘पहिले पाढे पंचावन्न’ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.





