गुगवाड,वार्ताहर : जत तालुक्यातील गुगवाड,वज्रवाडसह बहुतांशी तलाठी मुख्यालयी राहत नसल्यामुळे सामान्य जनतेच्या कामाचा खोळंबा होत असून, कर्मचार्यांना मुख्यालयी थांबण्याची सक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.तीव्र पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थितीत अधिकारी गावात हजर असणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागातील विकासाचा पाया असलेले तलाठी,कृषी सहाय्यक,शिक्षक मुख्यालयी थांबत नसल्यामुळे सामान्य नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. बरेच तलाठी मोबाईल सुध्दा बंद करून ठेवतात. त्यामुळे नागरिकांचा संपर्क होत नाही. तालुक्यातील बहुतांशी कर्मचारी तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणाहून अप-डाऊन करतात. बर्याच गावात आठ ते दहा दिवस फिरकत सुध्दा नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना कामासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी खेटे मारावे लागतात. त्यातही भेट होत नाही, त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक समस्येत आहे.
त्यातच कर्मचार्यांच्या शोधासाठी त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागतो.तलाठी, शिक्षक, कृषी सहाय्यकांना शासन निर्देशानुसार सजावर राहाणे बंधनकारक असूनही कुणीही हा नियम पाळत नाही. जनतेला वार्यावर सोडून प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार कर्तव्य बजावत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या दुष्काळीस्थिती असून, गावागावात पाणी व चाराटंचाई आदी गंभीर समस्या आहेत. कर्मचार्यांनी सजावर थांबून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करणे आवश्यक असतांना कुणीही गांभीर्याने घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कर्मचार्यांना मुख्यालयी थांबण्याची सक्ती करावी यासाठी स्वत: जिल्हाआधिकाऱ्यानी लक्ष घालावे अशी मागणी आहे.
वज्रवाडला तलाठी येईनाचं
वज्रवाडचा तलाठी सध्या कधीतरी गावात येत आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्याचे दाखले मिळत नाहीत.नेमणूकीपासून सतत दिवस तलाठी गैरहजर राहत असल्याने नेमका तलाठी कोन आहे.हेही नागरिकांना माहिती नाही.त्यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.वरिष्ठांनी लक्ष घालून कायमस्वरूपी तलाठी नेमावे अशी मागणी होत आहे.





