

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून तालुक्यातील सर्व मोठ्या गावांची तहान भागवणारे तलाव पूर्णतः कोरडे ठणठणीत पडले आहेत.संख,दरिबडची,उमदी,माडग्याळ, तिकोंडी,बिंळूर,गुगवाड परिसरात लोकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील अनेक गावाचे टँकर मागणीचे प्रस्ताव अजूनही तहसील कार्यालयातच असल्याने येथील जनता त्रस्त झाली आहे.पाण्यावाचून जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. माण तालुक्यातील गावोगावचे पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटू लागले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलने देखील तळ गाठला आहे. कर्नाटकातील पाणी तातडीने महाराष्ट्रातील तलावात टाकणे गरजेचे असताना त्या पाण्यासाठी फक्त श्रेयवादच चालू आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. हळूहळू संपूर्ण तालुका पाणी टंचाईने व्यापू लागला आहे. तालुक्यातील 113 महसुली गावांपैकी 40 गावांना व 185 वाड्या-वस्त्यांना टँकर सुरू करणे गरजेचे आहे. सध्या 6 गावांना टँकर दिले आहेत. यामध्ये जवळपास हजार पशुधन तर 25 हजार नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.जत पंचायत समितीच्या पाणी पुरवठा शाखेकडे टँकर मागणीचे प्रस्ताव अजूनही वाढत आहेत.