लक्ष्मण-शक्तीसाठी 14 दिवसांच्या वनवासाला वनवाशी रवाना
जत,प्रतिनिधी : सध्याच्या डिजिटल स्पर्धेच्या कलीयुगात माणसांना प्रचंड ताण-तणावाला सामोरे जावे लागत आहे. जीवनातल्या सर्व इच्छा व गरजांची पूर्तता होते.मात्र मानसिक सुख मिळत नाही.मन प्रसन्न व आनंदी ठेवायचे असेल तर आध्यत्मिक हाच पर्याय असून मनःशांतीसाठी आध्यत्मिक कार्यक्रमाचा गजर व जागर झाला पाहिजे असे प्रतिपादन भाजप नेते डॉ.रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले.
डफळापूर (ता.जत)येथील लक्ष्मण-शक्ती सोहळ्यानिमित्त 14 दिवसांच्या वनवासाला चाललेल्या भाविकांना 14 दिवसांचा फलाहार वाटप कार्यक्रम डॉ.आरळी यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच बालिका चव्हाण,माजी सभापती डॉ.देवयानी गावडे,डॉ. साहेबराव गावडे,दयानंद संकपाळ,गुरुराज आक्की,सौ मनिषा आक्की अदि मान्यवर उपस्थित होते.हा लक्ष्मण- शक्ती सोहळा 1 ते 15 जानेवारी अखेर संपन्न होणार आहे.संस्थान कालीन डफळापूर नगरीमध्ये प्रथमच लक्ष्मण शक्ती सोहळा होत आहे.या सोहळ्यात मोठ्या
संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांच्या वनवासी प्रस्थान कार्यक्रमाला डफळापूर बसस्थानक चौकात वनवासी भाविकांना मुस्लिम समाज बांधवाकडून शुभेच्छा व फळाचे वाटप करण्यात आले. डफळापूर ते पंढरपुर असे चौदा दिवस पायी वनवास करण्यात येणार आहे.सोमवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी वनवासी भाविकांचे डफळापूर येथे आगमन होणार आहे.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर बाजारपेठेत सायंकाळी 7 वाजता गुरुदेव आश्रम बालगावचे श्री.अमृतानंद महाराज यांचे प्रवचन होणार आहे.महाप्रसादानंतर रात्री 9 वाजता रामायण वाचन तर मंगळवारी पहाटे फुले वाहणे व महाप्रसाद आहे. हा सोहळा पार पाडण्यासाठी सोहळ्याचे अध्यक्ष धनाजी पाटील,उपाध्यक्ष संजय कोळी,संजयकुमार गुरव नियोजन करत आहेत.
डफळापूर येथे लक्ष्मण-शक्ती सोहळ्यानिमित्त 14 दिवसांच्या वनवासाला चाललेल्या भाविकांना फळाचे वाटप करताना डॉ.रवींद्र आरळी.





