ताकारी, म्हैसाळ,
टेंभू प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर
– टेंभूचे काम गेल्या 4 वर्षात 100 टक्क्यांवर पोहोचवले
– टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाची रु. 4088.94 कोटीची सुप्रमा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात
– ताकारीचे 13 हजार हे. म्हैसाळचे 42 हजार हे. आणि टेंभूचे 94 हजार हे. सिंचन बंदिस्त वितरिकेद्वारे
– राष्ट्रीय महामार्ग 20 हजार कि.मी. कामांना मंजुरी, त्यापैकी 7 हजार कि.मी.ची कामे पूर्ण
– धनगर समाजाला लवकरच आरक्षण देण्यास प्रयत्नशील
– बिरोबा मंदिर विकासासाठी 15 कोटींची घोषणा
सांगली दि. 23 (जि.
मा. का.) : दुष्काळग्रस्तांना वरदान ठरणाऱ्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांना शासनाने
गती दिली असून, टेंभूचे काम गेल्या 4 वर्षात 100 टक्क्यांवर पोहोचवले आहे. या योजनेचा
चौथा टप्पा पूर्ण असून, पाचवा टप्पा पूर्णत्वाकडे आहे. 2019 पर्यंत कामे पूर्ण करून
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी शासन कटिबध्द आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील
कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत
सिंचन योजना मुख्य कामे पूर्णत्वाची वचनपूर्ती आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
अंतर्गत सांगली-सोलापूर मार्गावरील सांगली-बोरगाव-वाटंबरे-मंगळवेढा-सोलापूर मार्गाच्या
चौपदरीकरणाच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक
आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
होते.
यावेळी महसूल, मदत
व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय
शिक्षण, जलसंपदा, लाभक्षेत्र मंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,
अन्न व औषध प्रसासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री
तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय
शिवतारे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार सुरेश
खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद
अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, माजी आमदार सर्वश्री पृथ्वीराज देशमुख,
दिनकर पाटील आणि रमेश शेंडगे, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकार
अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्ह्यातील ताकारी
– टेंभू आणि म्हैसाळ प्रकल्पाची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करून जिल्ह्यातील दुष्काळी
भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी रु. 4959.91 कोटीची तर टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाची रु.
4088.94 कोेटीची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. ताकारी म्हैसाळ टेंभू 1042 कि.मी.
लांबीचे कालवे आहेत, मागील 20 वर्षात त्यापैकी केवळ 500 कि.मी. चे कालवे झाले, मात्र
गेल्या 4 वर्षात 400 कि.मी.ची कामे पूर्ण करून सिंचनाची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था
दुष्काळी भागात निर्माण केली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी
कालव्यांऐवजी बंदिस्त वितरिकेव्दारे पाणी वितरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे
सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यामध्ये ताकारी प्रकल्पांतर्गत 13 हजार
हे. म्हैसाळ प्रकल्पांतर्गत 42 हजार हे. आणि टेंभू प्रकल्पांतर्गत 94 हजार हे. सिंचन
बंदिस्त वितरिकेव्दारे करण्यात येत आहे. पुढील 6 महिन्यात हे काम पूर्ण करून दीड लाख
हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा संकल्प आहे. बंदिस्त वितरिकेव्दारे सिंचन व्यवस्था
निर्माण केल्याने शेत जमीन अधिग्रहण थांबले आहे. तसेच योजनेचा 800 कोटींचा खर्च कमी
झाला आहे. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेतील आगळगाव – जाखापूर
उपसा सिंचन योजना, टप्पा 6 अ (अंकले) व टप्पा 6 ब (खलाटी) उपसा सिंचन योजनेची संकल्पना
ते प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यापर्यंतची कार्यवाही विक्रमी वेळेत पूर्ण झाली असल्याचे
त्यांनी यावेळी सांगितले. दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून पाण्याद्वारे
शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा शासनाचा संकल्प आहे. दुष्काळी भागात पाण्याचा
थेंब न थेंब पोहोचेपर्यंत शासन शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दुष्काळी काळात उपसा
सिंचन योजनेद्वारे सांगली जिल्ह्यातील 250 तलाव भरून घेतले असल्याचे सांगून मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर
आणणार आहे. यासाठी शासनाने 1 लाख सोलर पंप
विकत घेतले असून ते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. यामुळे उपसा सिंचन योजनांच्या
वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात
ड्राय पोर्टचा प्रकल्प प्रस्तावित केला असून, त्यासाठी 250 हे.चा प्रस्ताव तयार आहे.
त्यामुळे यापुढे द्राक्ष, डाळिंब, बेदाण्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होतील,
असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस म्हणाले, शासनाने 5 वर्षात 50 हजार किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेतली असून,
यामध्ये राष्ट्रीय महामार्गातंर्गत 20 हजार कि.मी. ची कामे हाती घेतली असून, यापैकी
7 हजार कि.मी.ची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, राज्य मार्गांच्या 10 हजार किलोमीटरच्या
व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 30 हजार किलोमीटर कामांचाही समावेश आहे. या माध्यमातून
मोठ्या प्रमाणात दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस म्हणाले, शासनाने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा क्रांतीकारी
निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला
अनुसूचित जमातीचे आरक्षण लवकरच देऊ. आरेवाडी बिरोबा मंदिर विकासासाठी 5 कोटी रूपये
दिले असून, आणखीन 15 कोटी रूपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टेंभू – ताकारी योजना
पूर्ण करून चार लाख एकर सिंचनाखाली आणणार – ना. नितीन गडकरी
टेंभू योजनेचा बळीराजा
जलसंजीवनी योजनेत समावेश केला असल्याचे सांगून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने
पूर्ण करून सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील 4 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली
येईल. शेतकऱ्यांनी ठिबकव्दारे सिंचन करून उत्पादनात वाढ करावी व कारखानदारी उभारावी.
राज्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत 108 प्रकल्प, तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत
28 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये सांगली, सोलापूर जिल्ह्यासाठी 3 हजार 500
कोटींची मान्यता दिली आहे. यामध्ये 25 टक्के निधी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत
व 75 टक्के निधी नाबार्डकडून दिला जाईल. या योजनांना केंद्राकडून तात्काळ निधी उपलब्ध
करून देवून, या योजना येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणार
आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ताकारी टेंभूसाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा पुढाकार आणि केंद्र
शासनाचे सहकार्य यातून हे प्रकल्प लवकरच मार्गी लागतील व दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातून
आनंदाश्रू येतील, असा विश्वास व्यक्त करून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
म्हणाले, महाराष्ट्र व गुजरात राज्यांत नदीजोड प्रकल्प राबवण्यास प्राधान्य दिले आहे.दमणगंगा पिंजर धरण बांधून पाणी गोदावरीत सोडून राज्याच्या
काही जिल्ह्यांमधील शेती सिंचनाखाली आणली जाईल. याबरोबरच कोयनेचे समुद्रात वाहून जाणारे
पाणी वाचविण्यासाठी विशेष प्रकल्प राबविला जाईल. मराठवाड्यातील धरणे बांधून दुष्काळी
भागाला पाणी देणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तासाठी भरीव काम करून दुष्काळग्रस्तांना
नवीन जीवन देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्याबद्दल त्यांनी
समाधान व्यक्त केले.
नामदार नितीन गडकरी
म्हणाले, जिल्ह्यातील 10 हजार कोटींच्या रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. त्यापैकी
7 हजार 114 कोटींच्या कामाची सुरूवात आज केली आहे. अहोरात्र काम करून ही कामे येत्या
मार्चपर्यंत पूर्ण केली जातील. मिरज शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रूपये तरतूद या
कार्यक्रमात त्यांनी जाहीर करून, तसे आदेशही महापौर संगिता खोत यांच्याकडे सुपूर्द
केले. यासह मिरज इस्लामपूर व अन्य मार्गाची 1700 कोटींची कामे मंजूर केली आहेत. आता
प्रशासनाने रस्त्यांच्या बाजूंच्या नद्या-नाल्यांच्या खोलीकरण व रूंदीकरणाचा भरीव कार्यक्रम
हाती घेवून रस्ते विकासाबरोबरच नद्या-नाल्यांमध्ये पाण्याचा साठा करण्यास प्राधान्य
द्यावे. यासाठी सांगली व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प हाती घ्यावा, असे त्यांनी
सूचित केले.
यापुढे शेतकऱ्यांनी
ऊस पीक तसेच, साखर निर्मितीला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यावा, असे
आवाहन करून श्री. गडकरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब आणि बेदाण्यांाना
आंतरराष्ट्रीय बाजारपेठा निर्माण व्हाव्यात, यासाठी जिल्ह्यात ड्राय पोर्ट निर्माण
करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी लागणारा 800 ते 1000 कोटी रूपयांचा निधी
जेएनपीटीच्या माध्यमातून दिला जाईल. राज्य शासनाने यासाठी आवश्यक असणारी जमीन उपलब्ध
करून द्यावी, असे ते म्हणाले.
जलसंपदा मंत्री गिरीश
महाजन म्हणाले, राज्यात गेल्या चार वर्षांत पाटबंधारे प्रकल्पांच्या कामांना गती दिली
असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून दुष्काळग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचा
शासनाचा प्रयत्न आहे. ताकारी – टेंभू – म्हैसाळच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता
दिली आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत या योजनेचा समावेश केला असून, लवकरात लवकर
ही कामे पूर्ण केली जातील. केंद्र व राज्य शासनाने अनेक प्रलंबित योजना मार्गी लावल्या
आहेत. तर शेतकरी हिताच्या योजनांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. कर्जमाफी, मराठा
आरक्षण असे महत्त्वपूर्ण प्रश्नही शासनाने मार्गी लावले आहेत.
प्रारंभी मान्यवरांच्या
हस्ते दीप प्रज्वलन करून दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व दिवंगत माजी मंत्री
शिवाजी बापू शेंडगे यांना अभिवादन केले.
जिल्हाधिकारी वि.
ना. काळम आणि अतुलकुमार यांनी स्वागत केले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष
संजय पाटील यांनी प्रास्ताविकात राज्य व केंद्र शासनाने सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी
राबवलेल्या योजना व दिलेल्या निधीचा उहापोह केला. सूत्रसंचालन विजय कडणे, श्वेता हुल्ले
यांनी केले. या कार्यक्रमास विविध पदाधिकारी, अधिकारी, जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.






