जत : जत तालुक्यातील वळसंग येथील भानुदास राजोबा कांबळे यांच्या झोपडीवजा घराला आग लागून झोपडी शेजारी बांधण्यात आलेल्या सहा शेळ्या व चार बोकडाचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
वळसंग येथील भानूदास कांबळे हे शेती करतात. शेती बरोबरच जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन करतात. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास भानुदास व त्यांचे कुटूंबीय शेळ्यांना पाणी पाजून झोपडी शेजारी शेळ्यांना बांधून ते शेतात गेले होते दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली काही वेळातच रोज रूप धारण केल्याने झाली या घटनेत सहा शेळ्या व चार बोकडांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत कांबळे कुटूंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर प्रशासनाने पंचनामा केला आहे.
या घटनेची माहिती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या सदस्यांनी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती ,श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांना दिली. शनिवारी तुकाराम बाबा महाराज यांनी घटनास्थळी भेट देत कांबळे कुटूंबियांचे सांत्वन केले. बाबांनी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेमार्फ़त कांबळे कुटूंबियांना जीवनावश्यक किट व रोख रक्कमेची मदत केली. यावेळी मानव मित्र संघटनेचे सदस्य पुजारी, कुमार इंगोले, सागर मोरे आदी उपस्थित होते.
मदतीनंतर कांबळे कुटूंबियांनी तुकाराम बाबा महाराज यांचे आभार मानले. यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, रखरखत्या उन्हात जत तालुक्यात आगीच्या घटनेत होत असलेली वाढ ही चिंताजनक आहे. वळसंग येथे घडलेली घटना दुर्देवी आहे. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेकडून आम्ही शक्य ती मदत केली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी कांबळे कुटूंबियांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.