आटपाडी : आटपाडीच्या शिवाजी आणि तानाजी या पाटील बंधूंच्या सावकारीने तालुक्यातील लोकांना मोठा त्रास झाला आहे. अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे या सावकारीचा शेवट केल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.खाजगी सावकारीमुळे आत्महत्या व विषारी औषध पिण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आटपाडी येथे निघालेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी पंढरपूरचे माऊली हळदनकर,माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, दादासाहेब मरगळे, अनिल पाटील, अशोक माळी, रुपेश पाटील, लक्ष्मण बालटे, विष्णू अर्जुन, अनिल सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.पडळकर म्हणाले काही दिवसांपूर्वी गळवेवाडीच्या अप्पा गळवे या शेतकऱ्याने सावकारीला कंटाळून आत्महत्या केली. या सावकारीमध्ये मध्यस्थी केलेल्या मच्छिंद्र धोंडिबा माळी यांना सावकाराने वेठीस धरल्यामुळे त्यांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.