बोर्गी येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
सोन्याळ,(वार्ताहर):आज मुलगा आई-वडिलांना विचारेना, व्यसनाधिनता, खून-हाणामार्या वाढल्या आहेत. सर्वत्र आराजकता माजली आहे. आजच्या मुलांवर संस्कार घडवण्याची गरज आहे. शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी फक्त गुणांच्या मागे लागलेले आहेत. समाज,देश आदर्श बनवायचा असेल तर पहिल्यांदा नीतीवंत चारित्र्यवान व संस्कारक्षम असे चांगली पिढी घडविणे महत्त्वाचे आहे, तरच भारताचा भविष्यकाळ उज्वल आहे असे प्रतिपादन बालगाव (ता.जत) येथील मठाचे मठाधिश अमृतानंद महास्वामीजी यांनी बोर्गी (ता.जत) येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले.
बोर्गी येथील सहारा कला,क्रीडा,व्यायाम व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रविंद्र आरळी होते. यावेळी बोलताना अमृतानंद महास्वामीजी म्हणाले, सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आशियाई स्पर्धेत फक्त 59 पदके मिळतात. मात्र इंडोनेशियासारखे छोटे देश शतकांवर पदके मिळवतात. आपल्याकडील शिक्षण पद्धती चुकीच्या मार्गाने चालली आहे. अभ्यास आणि गुण यांकडे आपण लक्ष देत आहोत. त्यामुळे खरे संस्कार बाजूला पडत चालले आहेत. हे असेच चालू राहिले तर देशात आराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संस्कारशील पिढी घडवण्याची गरज आहे.ते पालकांच्या बरोबर, शिक्षकांपुढेही मोठे आव्हान आहे.
डॉ.रविंद्र आरळी म्हणाले, कोणतेही कार्यक्रम आता पेपरलेस आणि फ्लॉवरलेस व्हायला हवेत. उपस्थितांना हार-तुरे यांना फाटा देऊन पुस्तक भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण करावा.सहारा ग्रुपने शिफारस केलेल्या रुग्णावर मोफत उपचार केले जातील. सहारा ग्रुपने राबवत असलेल्या फटाकेमुक्त कार्यक्रमातून बचत झालेल्या पैसेतून वाचनालय पुस्तके भेट व विविध सामाजिक उपक्रम व पाणी फाउंडेशन स्पर्धेतील काम, स्वच्छतेच्या बाबतीत राबलेल्या कामाचे कौतुक केले.
सभापती तम्मणगौडा रवी-पाटील म्हणाले,जत तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता चांगली अाहे. ती आणखी उंचावण्यासाठी शिक्षण विभागासह माझे सहकार्य राहील.शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालक बनून काम केल्यास शाळा व विद्यार्थ्यांचा आलेख वाढत जाईल,दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची मुलांची प्रगती होईल. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व शाळांना भौतिक सोयी-सिविधा उपलब्धं करून सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका आमची राहील असे सांगितले.सहारा ग्रुपने वाटरकप स्पर्धेत सहभाग नोंदवून काम केल्याने त्यांचा पाणी फाउंडेशनचे जत तालुका समन्वयक तुकाराम पाटील व कुलाळवाडीचे सरपंच बजरंग कुलाळ यांनी ग्रुपचे अध्यक्ष दावल पुळूजकर, मौलाली सातभाई, आसिफ जहागीरदार व मल्लिकार्जुन उटगी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रकाश व्हनमुखे, संभाजी कोडग, रामराव मोहिते,मच्छिंद्र ऐनापुरे, सिद्धू कोरे,कुमार बिरादार, धरेप्पा कट्टीमनी, राजेंद्र गुट्टे, ज्ञानेश्वर कोळी,शिवगेनी नरळे,सीदाराय चिकलकी सिकंदर शेख, प्रकाश माळी, प्रल्हाद हुवाळे, भाऊसाहेब महानोर, वसंत यादव ,शिवराम यादव, लक्ष्मण अंकलगी मुरगेश कुमारमठ, महानंदा बिरादार, कन्याकुमारी पाटील, जयश्री पाटील आदी 28 शिक्षकांना प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह देऊन, आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सहारा ग्रुपचे सचिव आशिफभाई जाहगिरदार यांनी केले. प्रा.घन:शाम चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. आभार राजेंद्र बिराजदार यांनी मानले. आर. टी. ओ. जी.के. बिराजदार, अॅड, आडव्याप्पा घेरडे, अशोक बरडोल, सचिन होर्तीकर, संजय तेली,मोराबगीचे माजी सरपंच शिवानिंगप्पा पाटील, राघवेंद्र कोळी, यांनी सहारा ग्रुपला आर्थिक मदत जाहीर केली. गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधने, विनायक शिंदे, चनबसू चौगुले, संभाजी कोडग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आर. जी. बिरादार,काष्ट्राईब संघटनेचे लखन होनमोरे, मलकारी होनमोरे,गांधी चौगुले, लकाप्पा शिरगट्टी, बोर्गीचे उपसरपंच राघवेंद्र होनमोरे मंडळाचे अध्यक्ष दावल पुळुजकर, उपाध्यक्ष मौलाली सातभाई यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.कार्यक्रमास बसवराज बडीगेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.जी.पवार, सोमनिंग बोरामणी,सरपंच कल्पना बुरुकुले,मारुती चव्हाण, फत्तुसो नदाफ, रमेश राऊत उपस्थित होते.
बोर्गी (ता.जत)येथील सहारा ग्रुपचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना अमृत्तानंद स्वामी, डॉ.रविंद्र आरळी,तम्मणगौडा रवीपाटील,अॅड.आडव्याप्पा घेरडे व मान्यवर





