जत,प्रतिनिधी : पूर्व भागातील चार गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून 9 कोटी 96 लाख 28 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.कायम दुष्काळी असणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी मरणयातणा भोगण्याची वेळ आलेल्या अंकलगी,जाड्डरबोबलाद, बालगाव व सोन्याळ येथे या पाणी योजना होणार आहेत.योजनेच्या कामासाठी आमदार विलासराव जगताप यांनी प्रयत्न केले आहेत.
जत तालुक्याचा पूर्व भाग कायमचा दुष्काळाने होरपळून निघतो. या परिसरात डिसेंबर मध्येच पाणी टंचाई भासू लागते. आजवर झालेल्या अनेक योजना कुचकामी ठरल्या आहेत. परिणामी दरवर्षी जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. म्हैसाळ योजनेचे पाणी पूर्व भागाला देण्यासाठी आमदार विलासराव जगताप यांचे प्रयन्त सुरू आहेत. ते पाणी आले तरी तलाव भरतील. तलावातील पाणी गावांना देण्यासाठी विविध योजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचे स्तोत्र कायम असणाऱ्या ठिकाणाहून पाणी उचलणे आवश्यक आहे. हे उद्देश साध्य करण्यासाठी पूर्व भागातील गावे मुख्यमंत्री पेयजल योजनेत सनावेश करण्याची मागणी केली होती. पण या योजनेत जिल्ह्यातील सहा गावाचाच समावेश झाला. यात जत तालुक्यातील गाव नव्हते.त्यामुळे पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आमदार विलासराव जगताप यांच्याबरोबर मुबंई येथे मंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन येथील परिस्थिती मांडली. आमदार जगताप यांनी पाठपुरावा केल्याने चार गावचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश झाला. त्याला 9 कोटी 96 लाख 28 हजार इतका निधी मिळाला आहे. त्यात सोन्याळला 2 कोटी 66 लाख 74 हजार, अंकलगी 1 कोटी 61 लाख 26 हजार, जाडरबोबलाद 3 कोटी 16 लाख 71 हजार व बालगावला 1 कोटी 84 लाख 15 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या योजनेचे काम सुरू होणार असून चार गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.





