संख, प्रतिनिधी : जत तालुक्यातून वाहणार्या एकमेव भोर नदी पात्राची वाळू तस्करांकडून खरवड निघाली आहे. तालुक्यातील कोरड्या पडलेल्या संख तलावांच्या पात्रातूनही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा बिनदिक्कत सुरू आहे. महसूल खात्याचे कर्मचारी या चोरीला अटकाव घालण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.या व्यवसायातून कमी वेळात भरपूर पैसे मिळत असल्याने तालुक्यातील वाळू तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही. तहसीलदारांनी सध्या किंवा पूर्वी कितीही प्रयत्न केले तरी ही वाळू चोरी थोड्या काळातच पुन्हा पूर्ववत होत असल्याचे अनेकवेळा सिध्द झाले आहे.दुष्काळाने होरपळणार्या जत तालुक्यातून भोर ही नदी वाहते. या भोर नदीकाठच्या संख,पांढरेवाडी, बालगाव,हळ्ळी,करजगी,जाल्याळ बुद्रुक,खंडनाळ, भिवर्गी,बोर्गी,बोळोंडगी,सुसलाद आणि सिध्दनाथ परिसरातून दररोज किमान 30 ते 40 ट्रॅक्टर व डंपरच्या सहाय्याने दिवसाढवळ्या वाळू उपसा केला जातो. कारवाई सुरू असेल तर रात्रीच्या वेळेला ही वाळू चोरी केली जाते. सध्या ट्रॅक्टर सहाय्याने वाळू चोरीची नवीन पध्दत अवलंबली जात आहे.सर्वाधिक संख,बालगाव,हळ्ळी, खंडनाळ,सोनलगी, आणि करजगी तालुक्यातील अन्य तलावातूनही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. जत -कवटेमहांळ लगतच्या कुडणूर, शिंगणापूर ओढापात्रात तर वाळू उपशामुळे 10 ते 12 फूट खोलीचे आणि 50ते 60 फूट लांबीचे खोल खड्डे पडले आहेत. नदीपात्राचीही अवस्था याहून वेगळी नाही.