
नवी दिल्ली – भारतात गांधी परिवाराचे महत्त्व वाढावे म्हणून इतरांनी दिलेले योगदान आणि इतरांचे बलिदान यांचे महत्त्व कमी केले गेले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. देशासाठी ज्यांनी योगदान दिले अशा शामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी आहे, काश्मीरमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. मात्र गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा अनेक सुपुत्रांचे योगदान आणि महत्त्व कमी केले गेले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशच्या एक दिवसीय दौ-यावर आहेत. तिथे राजगढमध्ये मोहनपुरा धरण योजनेचा लोकार्पण सोहळा झाला, या सोहळ्याच्या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आरोप केला.
कोणतीही योजना किंवा प्रकल्प हे झपाटय़ाने होणा-या विकासाचे उदाहरण आहे यात शंकाच नाही. मात्र अशा प्रकल्पांमुळे सरकार कशा प्रकारे काम करते आहे हेदेखील जनतेपर्यंत पोहोचते असेही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. पाणी पाईपलाईनद्वारे शेतात कसे पोहोचू शकेल यावर भर देण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या जनसभेत त्यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला.



