जत,प्रतिनिधी: वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या हेतूने पोलीस रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी, शहरातील बेशिस्त वडापचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जत शहरातील सर्वच मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर वडापचालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत आहेत.क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वडापचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात असली तरी ही कारवाई नियमितपणे होत नसल्याने वडापचालकांची मुजोरी वाढत चालली असल्याची तक्रारी नागरिकांच्या आहेत. शहरातील स्टँड परिसर,विजापूर रोड,बिंळूर रोड,उमराणीरोड,शेगाव चौकासह अन्य वाहतूक मार्गांवर वडापचालक चालकाच्या आसनाशेजारी दहा ते बारा प्रवासी कोंबून वाहतूक करीत असल्याचे चित्र दिसून येते.परराज्यातील गाड्यांना कागदपत्रे नाहीत तसेच अन्य कारणावरून सर्वसामान्य वाहनधारकांना वेठीस धरणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी बेशिस्त व नियमांची पायमल्ली करणाऱ्या वडापचालकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.





