आटपाडी,प्रतिनिधी: रावसाहेब पाटील यांचेसारखे दुष्काळी पट्यातील प्रामाणिक बापुनिष्ठ कार्येकर्ते, आमदार-खासदार व्हायचे असतील तर आमदार जयंतराव पाटील यांनी या पुढच्या काळात दुष्काळी पट्याचे, माणदेशाचे नेतृत्व करावे असे मत जेष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांनी व्यक्त केले.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 34 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सादिक खाटीक पुढे म्हणाले, चांदोलीला झालेले धरण खुजगावला व्हावे यासाठी बापूंनी मोठा संघर्ष केल्याचे महाराष्ट्राला माहित आहे. जर धरण खुजगावला झाले असते तर ते कदाचित कोयने इतक्या मोठ्या क्षमतेचे धरण झाले असते. याच्या मोठ्या पाणीसाठ्यातुन जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरजेचा दुष्काळी भाग, आटपाडी, खानापुर या दुष्काळी भागांना पाणी देणार्या विशिष्ठ व्यवस्था, योजना मोठ्या प्रमाणावर साकारल्या असत्या. तथापी, बापूंच्या या दूरदृष्टीच्या विचाराला राजकीय हेतुने दिली गेलेली बगल दुष्काळग्रस्तांवर अन्याय करणारी ठरली होती. बापूंचा विचार त्यावेळी सत्यात आला असता तर आज दुष्काळी भागात दिसणारे कृष्णेचे पाणी 30 वर्षापुर्वीच दुष्काळी भागात आले असते. त्यांंच्या पश्चात 28 वर्षे आमदार असलेले त्यांचे सुपुत्र जयंतराव पाटील यांनी दुष्काळग्रस्तांचे लोकप्रतिनिधी मानत न्यायानेच शेतीच्या पाणीप्रश्नासंबंधी अत्यंत मोलाची भुमिका बजावली होती. अनुशेषाच्या अडसरातुन मार्ग काढण्यासाठी राज्यपालांच्या गाडीचे सारथ्य करीत या योजनांना भरीव निधी उपलब्ध करुन दिला होता. जयंतरावांच्यामुळेच राज्यातल्या शेकडो पाणी योजना मार्गी लागल्या आहेत.





