जत : निकृष्ट काम अन् सदोष तांत्रिक पद्धत यामुळे दरवर्षी जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जाते. वाहन चालवायचे म्हणजे उरात धडकीच भरते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हा प्रश्न पडतो. मनपाप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. या विभागाचे शहर हद्दीत काही रस्ते आहेत. त्यावर एवढे खड्डे आहेत की कोणता मोठा आणि जास्त धोकादायक याचा उलगडा करणे भल्याभल्यांना जमणार नाही.
हीच अवस्था शहरभर आहे.मुख्य असो की अंतर्गत.. कुठल्याही रस्त्यावर खड्डे तुमची ‘पाठ’ सोडणार नाहीत. त्यात पावसाळ्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांबरोबरच उखडलेली खडी आणि धूळ चारली जात आहे. धूळ खडीमुळे चुकून वाहन स्लीप झालेच तर थेट ‘खड्ड्यात’ जाण्याची व्यवस्था सारेच रस्ते करतील यात तिळमात्र शंका नाही. ‘कथा कुणाची अन् व्यथा कुणाला..’ अशी ही स्थिती. म्हणजेच खाबुगिरी यांची आणि त्रास प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या जनतेला असा हा प्रकार पावसाळ्यात रस्त्यांविषयीची ओरड होतेच.
त्यानंतर कंत्राट निघतात. तेही निकृष्ट काम होते. पुन्हा तीच स्थिती होते. मुरुमाऐवजी माती टाकून पैसे उकळणे हा काहींचा धंदा आहे. दुसरीकडे आहे ते खड्डे असह्य झालेत. त्यामुळे व्यक्ती, संस्था-संघटना, सामाजिक संस्था वा अन्य नागरिकांनी विटा, मुरूम सिमेंट टाकून खड्डे तात्पुरते बुजवत दुरुस्ती करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.