सांगली : सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काही फायदा झाला नाही.कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे, असे आपले मत आहे. यावर सर्वांशी बोलून निर्णय घेऊ अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीतील पत्रकारांशी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी यावेळी कोरोना रोखण्याबाबत करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची तसेच नियोजनाची माहिती दिली.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, मध्यंतरी केलेल्या लॉकडाऊनचा काही उपयोग झाला नाही. बाजारात फिरताना नागरिकांना कोरोनाची भिती वाटत नाही असे दिसते. कोरोना वाढत चालला आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे, असे चित्र दिसते. प्रशासन तयारी करत आहे.
ते म्हणाले, “कम्युनिटी स्प्रेडिंग सुरु आहे. प्रशासनाने खासगी रुग्णालये अधिग्रहीत केली आहेत. पण, तेथील कारभाराबाबत तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी आणि कारवाई करावी. तसेच बेड उपलब्धता सर्वांना कळेल यासाठी जिल्ह्यात सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम करावी. रुग्णांनी बेड शोधन फिरण्यापेक्षा त्यांना या सिस्टीम मध्ये जवळच्या रुग्णालयात करण्याची व्यवस्था करावी. ग्रामीण भागात चांगली उपचाराची साय उपलब्ध केल्यास सांगली, मिरजेवर त्याचा ताण पडणार नाही यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांना केल्या.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी यंत्रणा, मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे मुंबईतील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफला पाचारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मुंबईचे आयुक्त चहल यांना यंत्रणा देण्याची सूचना करणार आहे. ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर्सही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जी यंत्रणा बाहेरुन मिळेल ती आणू. जिल्हाधिकाऱ्यांसोबत लवकरच जिल्ह्यात फिरणार आहे. सर्व यंत्रणेची पाहणी करुन माहिती घेऊ. नवीन मशीन खरेदी करु. कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड होत आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करु, असे ते म्हणाले.





