जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात आधार प्रमाणीकरण होऊन कर्ज मिळावे, अशी मागणी युवा सेना तालुका उपप्रमुख प्रवीण अवरादी यांनी कृषिमंत्री दादा भिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हा बँकेचे निरीक्षक अरुण कोळी यांच्याकडे पाठवली आहे. कोरोनाच्या संकटाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात ग्राहक नव्हते. द्राक्षे, डाळिंबाला बाजारात दर मिळाला नाही. पुणे, मुंबई, वाशी येथील भाजी मार्केट बंद असल्यामुळे माल कवडीमोल दराने विकावा लागला आहे. यामुळे महात्मा जोतिराव फुले कर्जमाफीअंर्तगत ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ झाले आहे,त्यांना खरीप हंगामासाठी आधार प्रमाणीकरण करुन पीककर्ज द्यावे.
तसेच ज्यांचे कर्ज नाही व थकबाकीही नाही,अशा शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करुन द्यावे,अशी मागणी निवेदनात केली आहे.निवेदनावर शिवसेना जिल्हा उपप्रमुख तम्मा कुलाळ, तालुका शिवसेना प्रमुख अंकुश हुवाळे, युवा सेना तालुका अधिकारी नागनाथ मोटे, युवा सेना तालुका उपाधिकारी प्रवीण अवरादी, संख शहर शिवसेना शाखा प्रमुख व्यंकटेश जोशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.