जत : सध्या जत शहर व तालुक्यात डेंग्यूसहृश आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. गत काही महिन्यांत शहरासह ग्रामीण भागातील तब्बल 200 वर संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांपैकी दोघाचा मुत्यू झाला आहे.तर 50 पेक्षा जास्त रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. दरम्यान, नागरिकांनी सावध राहून आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा पाळावा आणि काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या अति आणि अवेळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. त्या माध्यमातूनही या डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे किरकोळ आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. गेल्या जानेवारीपासून ते ऑक्टोबरपर्यंतची माहिती प्रशासनाने दिली आहे. साठलेल्या स्वच्छ पाण्यात ‘एडीस’ नावाचे डास होतात आणि ते चावल्यानंतर डेंग्यूसदृश आजाराचा फैलाव होत आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा. यावेळी घरातील रांझण, माठ, वापरात नसलेले टायर, डबे तसेच इतर पाण्याचे स्रोत अथवा साठवलेली पाण्याची साधने कोरडी करून घ्यावीत जेणेकरून या रोगाचा फैलाव होणार नाही, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



