जत,प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांच्यासाठी जिवाचे रान केले.संपूर्ण जिल्ह्याची
एकसंधपणे मोट बांधून त्यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस झटलो.कोणतीही तमा न बाळगता दिवसरात्र प्रचार केला. परंतु माझ्या विधानसभा निवडणुकीत याची कोणतीही जाणीव न ठेवता ते प्रचारात गुंतले नाहीत.माझ्याविरोधातील बंडखोरांना त्यांनी छुपा पाठिंबा दिला,अशी खंत आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, जत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी झाली होती.पक्षातील बंडखोरांवर पक्षीय पातळीवर कारवाई करून त्यांना थोपवण्यासाठी कोणतेही प्रयत्न वरिष्ठ पातळीवर झाले नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर विद्यमान आमदार निवडणूक लढवत असताना भाजपमधील काही लोक अपप्रचार करत होते.बंडखोरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना छुपा आशीर्वाद,अभय देण्याचा प्रयल झाला आहे.त्यामुळे त्याचा फटका मला विधानसभा निवडणुकीत बसला आहे.
जनशक्ती विरूध धनशक्तीचा वापर
जगताप म्हणाले, जत तालुक्याच्या इतिहासातील ही पहिली निवडणूक आहे, कारण या निवडणुकीत पैशाचा फार मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. लोकांना मोठमोठी आमिषे दाखविली गेली.जनशक्ती विरुध्द धनशक्ती, अशीच ही निवडणूक झाली.





