

माडग्याळ, वार्ताहर: अनेक वर्षापासून खड्ड्याने बनलेल्या जत-चडचण या राज्यमार्ग क्रमांक 155 ला दुरूस्ती कामासाठी निधी मिळाला आहे. व्हसपेठ ते चडचण महाराष्ट्र हदीपर्यंत रस्ता रुंदीकरण व सुधारणा करण्याचे काम चालू आहे.बाजूच्या खचलेल्या साईटपट्ट्या खोदून त्यावर मुरमीकरण करण्याचे काम प्रस्तावित आहे.त्यासाठी मुरम टाकण्याची गरज असताना संबधित ठेकेदाराने चक्क माती टाकून साईटपट्ट्या भरण्याचा प्रकार समोर आला आहे. याकडे लक्ष्मी दर्शनामुळे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांधारीची भुमिका घेतली आहे. त्यामुळे निकृष्ठ कामाचा नमुना येथे पाह्याला मिळत आहे.याबाबत जनतेतून संताप व्यक्त होत आहे. झालेल्या कामाचे गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
जत पुर्व भागाला व कर्नाटकला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. चडचण हद्दीपासून ते व्हसपेठ डोंगरापर्यंत मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत या रस्ता कामासाठी साडेसोळा कोटीचा निधी मंजूर झाला आहे.यांच्या दुरूस्तीचे काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू आहे. रस्ता रूंदीकरण, मजबूतीकरण व डांबरीकरण करणे असे कामाचे स्वरूप आहे. चडचण हद्दीपासून ते सोन्याळ जवळील नदाफ फाट्यापर्यंत रस्ता रुंदवण्याचे कांम अंतिम टप्प्यात आले आहे.उर्वरित काम बाकी आहे.इस्टीमेटप्रमाणे काम करण्यात येऊन कामाची गुणवत्ता राखणे अपेक्षित होते. परंतु कामाची दर्जा अतिशय सुमार होताना दिसत आहे. रस्ता रुंदवताना दोन्ही बाजूला खोली व रुंदीत फरक करण्यात येत आहे. रुंदावलेल्या खड्ड्यात खडी व खडीबरोबर उत्तम प्रतीचा मुरूम टाकणे आवश्यक असताना रस्त्याकडेची माती ओतून काम केले जात आहे. तर काही ठिकाणी चर खोदून चक्क माती टाकण्यात येत आहे.खडी मध्ये माती मिसळून व जुजबी पद्धतीने पाणी मारून रोलर फिरवले जात आहे. माती मिसळून काम होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा तालुक्यातील महत्वाचा रस्ता आहे. कित्येक वर्षांनंतर एवढ्या मोठया प्रमाणात निधी देण्यात आला आहे. या रस्ता कामासाठी साडेसोळा कोटी खर्च होत असताना या कामाकडे कुणाचेच कसे काय लक्ष नाही ? असा सवाल व्यक्त होत आहे. चक्क माती टाकून रस्त्याचे काम पूर्ण करताना लोकप्रतिनिधीचेही साफ दुर्लक्ष होत आहे. या कामावरील संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने असे निकृष्ट काम होत असल्याचा आरोप आहे. वरिष्ठांचाही पाठबंळ व लक्ष्मी दर्शनामुळे तेरी चुप मेरी भी चूप असा काहीसा प्रकार सुरू आहे.या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. रस्त्यावर खड्डे पडले की आपण सरकारला शिव्याशाप देतो.दुसरीकडे रस्ता दुरूस्ती करताना अधिकाऱ्यांवर सुज्ञ नागरिकांकडूनही कानडोळा केला जात आहे. चक्क माती मिसळून रस्ता बनवण्याचा प्रकार या भागात होत असून पूर्वभागातील काही गावच्या ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे. बांधकाम विभागाचे या कामाकडे योग्य देखरेख नसल्याने व खाबूगिरी जास्त असल्याने हे काम निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. एकीकडे विकास कामांकरिता शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी येतो. मात्र अशा दर्जाहीन कामांमुळे त्याचा अपव्यय होतो. अशी कामे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजेच परंतु कामावर देखरेख करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांलाही शासन होणे गरजेचे आहे.
दरम्यान,जत-उमदी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. रस्ता पूर्ण नादुरुस्त व खड्डेमय झाला असून, या रस्त्यावरून जाताना नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता 52 किलोमीटरचा आहे. गेल्यावर्षी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र त्यावेळेसही बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम अत्यंत निकृष्ट स्वरूपाचे केले असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कारवाई करून हा रस्ता पुन्हा दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती.महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भक्ताचे श्रंध्दास्थान असलेल्या गुड्डापूर येथील धानम्मादेवीच्या दर्शनासाठी हाजारो भक्त दररोज येत असतात.त्यांना अशा खड्डेयुक्त रस्त्यातून जावे लागत आहे.
जतला पुर्व भागाशी जोडणाऱ्या जत-चडचडण या प्रमुख मार्गाचे सुरू असलेले दर्जाहीन काम