जत | रस्त्यांत वाट बघताहेत यमदूत |
जत,प्रतिनिधी: शहरातील अनेक रस्ते रुंद झाले असून, अनेक वीजखांब रस्त्यांच्या मध्यभागी उभे आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या खांबांमुळे जतकरांवर अपघाताची टांगती तलवार असून, गेल्या चार वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. रस्त्याच्या मध्य भागातील वीजखांबावर आदळून एखाद्याचा बळी गेल्यानंतरच पालिका मुहूर्त शोधणार काय, असा सवाल आता जतकर करीत आहेत.
शहरात सुमारे दोनशे किमीचे रस्ते आहेत. गेल्या सहा वर्षात एक तोही अर्धा मंगळवार पेठ ते बँक ऑफ महाराष्ट्र पर्यत रस्त्यांचे रुंदीकरण झाले. शहर विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रूंदीकरण होणे गरजेचे असताना त्यावर मासिक बैठकीत चर्चा होताना दिसत नाही. नगरपालिका झाल्यानंतर रस्ता रुंदीकरणामुळे जतकरांना वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा होती. मात्र,अशा फोल ठरली आहे. कधी काळी रस्त्याच्या बाजूला असलेले वीजखांब आता मध्यभागी आल्याने वाहतुकीसाठी मोठा अडथळाच नाही, तर वाहनधारकांवर अपघाताची टांगती तलवारही आहे.
शहरातील रस्त्यांवरील वीजखांब हटविण्याबाबत पालिका महावितरणवर कोणत्याही हालचाली सहा वर्षात झाल्या नाहीत.त्यामुळे साक्षात मुत्यू रस्त़्यावर उभे आहेत.रस्त्यांच्या मध्यभागी वीजखांब वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरले आहेत. जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर रस्तावर तर मोठ्या डिपीच रस्त्याच्या मध्यभांगी आल्या आहेत. त्याशिवाय अनेक वीजखांब मध्यभागी असल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. असाच प्रकार शहरातील अनेक रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वर्दळीच्या भागात वाहतूक कोंडी
शहरात शेगाव चौक ते चडचण रोड,मंगळवार पेठ,स्टेट बँक शहरातील मुख्य बाजारपेठेचा परिसर आहे. या भागात रस्त्यांवर वीजखांब असल्याने एखादा दुचाकी किंवा चारचाकी वाहनधारक त्यावर आदळण्याची शक्यता आहे. या भागात वीजखांबांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे.
जत शहरातील विजापूर-गुहागर रोडवरील मुत्यूचे साक्षात सापळे बनलेले विद्युत डिपी व खांब