मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला | www.sankettimes.com
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन दिवसांनंतर मिटला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत एसटीच्या मान्यताप्राप्त संघटना आणि दिवाकर रावते यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
”एसटी कर्मचाऱ्यांनी या राजकारणात पडू नये”
‘इतकी वर्षे पगार नव्हते तरी कामगार काम करत होते. आता पगार वाढ देऊनही संप केला. कामगारांनी या राजकारणात पडू नये,” असं आवाहन दिवाकर रावतेंनी केलं.
शिवाय दोन वेळा संप करुनही कारवाई केली नाही, मेस्मा फाईलवर सही केली नाही, यापुढे असं पाऊल उचलू नये, असंही रावते म्हणाले.
”अगोदर पगार किती वाढलाय ते समजून घ्या”
”महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच ऐतिहासिक अशी 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. ही वेतनवाढ करारामध्ये परावर्तित करण्यासाठी एसटी प्रशासन आणि संघटना यांनी बैठक घेऊन वेतनवाढ बसवून घ्यावी,” असं आवाहन रावतेंनी केलं.
”कर्मचाऱ्यांमध्ये या वेतनवाढीसंदर्भात उलट-सूलट गैरसमज निर्माण झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी असं न करता आपली वेतनवाढ नेमकी किती झाली हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यात आली असून अचानक पुकारलेला बेकायदेशीर संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू व्हावे,” असं आवाहन रावतेंनी केलं.