जत,प्रतिनिधी:जत नगरपरिषदेला जतला 8 जून रोजी 6 वर्षे पूर्ण होत आहेत.यानिमित्ताने जत नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ नगरपरिषद प्रशासन व पदाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी जत नगरपरिषदेच्या समोर अनोख्या अशा संविधानिक पद्धतीने दि.8 रोजी सकाळी 11 वाजता एक दिवसीय उपोषण करीत असल्याची माहिती सामजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ढोणे पुढे म्हणाले की,गेल्या सहा वर्षात नगरपरीषद व ग्रामपंचयातीच्या कारभारात कोणताही बदल झाला नसल्याचे जाणवत आहे.फक्त नागरी सुविधा करामध्ये वाढ झालेली आहे. प्रत्यक्षात सुविधांचा अभाव आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असूनही नियोजनाअभावी शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.स्वच्छतेसाठी महिन्याला नगरपरीषदने लाखो रुपये खर्च करूनही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.त्यामुळे साथीचे आजार शहरात पसरत आहेत. नगरपरीषद हद्दीतील जागेची खरेदी विक्री करताना ना-हरकत प्रमाणपत्राची गरज नसताना अडवणूक होत आहे. प्रशासन व कर्मचारी यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. महिला पदाधिकारी यांच्या नातेवाईकांचा प्रशासनाच्या कारभारात हस्तक्षेप झाल्याने कर्मचाऱ्यावर मानसिक दडपण येऊन त्यांच्या कामावर विपरित परिणाम होत आहे. प्रशासन व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासासाठी नियोजन होत नाही. प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे कामे होत नाहीत.याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.शहरात सध्या जी विकासकामे सुरू आहेत त्या कामाचा गुणवत्ता व दर्जा याकडे दुर्लक्ष होत आहे.शहरातील रस्त्याची पुर्ती वाट लागली आहे. खड्डेमय रस्त्यातून जाताना नागरिकांचे अनेक आजार जडले आहे.शहरातील मुख्य नाल्यासह गटारी स्वच्छ न केल्याने पावसाळ्यात नागरी वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता आहे. गत वर्षीचा अनुभव बघून प्रशासनाने पावळापुर्व नियोजन करणे गरजेचे होते.मात्र ढिम्म यंत्रणेकडून नागरिकांच्या सुविधाकडेच दुर्लक्ष केले आहे. माहिती अधिकार कायदा हा केंद्र शासनाचा कायदा असून तो कार्यालयास बंधनकारक असतानासुद्धा एकाही अर्जाचे उत्तर देण्यास नगरपरीषद प्रशासन टाळते.जत शहरात महिला व पुरुषासाठी प्रमुख ठिकाणी सार्वजनिक विधी करण्यासाठी व्यवस्था नाही.याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. जत नगरपरिषदेच्या कारभारात सुधारणा होण्यासाठी शुक्रवार दि.8 रोजी नगरपरिषदेसमोर संविधानिक मार्गाने एक दिवसीय अनोखे उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जत शहरातील नागरिकांनी या उपोषणास पांठिबा असे आवाहन ढोणे यांनी केले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पूर्वी ज्यांच्या घरी शौचालय होती अशाना अनुदान मिळाले.पण प्रत्यक्षात ज्या लाभार्त्यानी बांधकाम केली आहेत. त्यांना अजूनही अनुदान मिळाले नाही.या अभियानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे.हा भ्रष्टाचार नगरपरीषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने झाला आहे.त्यांची ञयस्थ यंत्रणेकडून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.





