जत | कमी विद्युत दाबाचा नागरिकांना ‘शॉक’ ग्रामीण भागात समस्या | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी: उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून मार्च महिन्याच्या अखेरीस वैशाख वणवा पेटल्याचे नागरिकांना जाणवत असताना महावितरणकडून ग्रामीण भागात कमी विद्युत दाबाची समस्या निर्माण केल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. परत यात भर घालून विजेचा लंपडावाही सुरू केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये महावितरणप्रती रोष व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागात वेळी-अवेळी भारनियमन केले जात असून कमी विद्युत दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे. रात्रीच्या सुमारास वीज उपकरणे वीज असूनही काम करीत नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्णतेच्या लाटेचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर हा त्रास सहन करून रात्रीच्यावेळी शांतपणे आराम करणेही या गावातील नागरिकांना कठिण झाले आहे.
ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमाणात विजेचा वापर होत नसतानाही याच भागात महावितरणकडून मनमर्जीपणे या तुघलक धोरणांचा अवलंब का केला जातो? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भारनियमन, कमी विद्युत दाब सोबतच अवाढव्य विद्युत देयके असा समस्यांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे. महावितरण या गंभीर बाबीची दखल घेऊन भारनियम बंद करावे, वीज उपकरणे योग्य सुरू राहणार अशी वीजसेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.