जत | रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्यामुळेही वाहतुकीचे तीनतेरा | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी :जतेतील वर्दळीच्या असलेल्या महाराणा प्रताप चौकात अलिकडे वारंवार वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. बेफिकीर वाहन चालकांमुळे कोंडी नित्याचीच ठरली आहे. असे असताना आता हे कमी की काय म्हणून रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्यामुळेही वाहतुकीचे तीनतेरा वाजू लागले आहेत. त्यामुळे शेगाव चौक,ते विजापूर रोड पर्यतची वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठली असून लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी नागरिक करु लागले आहेत.
जत शहरातील मुख्य चौक असलेल्या महाराणा प्रताप चौकात वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरुन गोडोलीमार्गे विजापूर,चडचडण,सांगली,साताराकडे जाणारी व येणारी वाहतूक तसेच बिंळूर, बनाळी,येळवीकडे जाणारी व तेथून येणारी वाहतूक याच मार्गावरुन होते. या चौकातून शहरातील वाहतूकदारांबरोबर बाहेरच्या जिल्ह्यात जाणारी देखील वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. त्यात रस्ता दगड उखडून खड्डे पडले आहेत. तसेच उखडलेले खड्डे चुकवताना वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. चारही बाजूनी एकदम वाहने येत असल्यामुळे रस्ता पार करण्यात नागरिकांना अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक वेळा वाहनधारक आणि नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग झालेले आहेत. याच मार्गावरून महाविद्यालयकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची नेहमीच ये—जा असते. या चौकातून गडबडीत जाण्याच्या नादात अनेक वेळा विद्यार्थ्यांचे अपघात घडले आहेत. प्रशासनाने येथील वाहतूक कोंडी हटविण्यासाठी तसेच अपघात टाळण्याच्या दृष्टीने योग्य त्या अंमलबजावणी करण्याची गरज आहे. उखडलेल्या रस्त्यावर बॅरिकेटस् लावले तर वाहतूकही सुरळीत होईल.त्यामुळे डांबरीकरण लवकरच करण्याची मागणी नागरिकातून होऊ लागली आहे.