
जत,प्रतिनिधी : ज्याचे कंबरडे अवघडले आहे, मान दुखत आहे, अशा व्याधीग्रस्तांनी जत शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालवायला हरकत नाही. हो मात्र ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांना दाखवावे, असा फलक खड्डेयुक्त रस्त्यांवर लावायला हरकत नाही. कंबरडे मोकळे करण्याचा उपचारच जणू या रस्त्यांवर वाहन चालवताना अनुभवायला मिळतो आहे.तातडीची नड लक्षात घेऊन कुठलेही काम हाती घ्यायचे असते; रस्त्यावरील खड्डे जतचे दारिद्र्य् उघड करतात. इतर रस्ते तुलनेने चांगले असले तरी या रस्त्याची दुर्दशा पाहून जसे अंगण घराची अवकळा सांगते, त्याच पद्धतीने कामकाज सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना पुन्हा जतेत यायलाच नको, असा ठाम निश्चय करूनच काहीजण निघून जातात.त्यामुळे अशा रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिकेच्या कारभाराच्या प्रतिमेला तडा देत आहेत, याकडे पालिका केव्हा लक्ष देणार आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.रस्त्यांवर पॅचवर्क होत नसल्याने खड्ड्यांचे आकार वाढत चालले आहेत, याच रस्त्यावर पालिकेचे नवेे पदाधिकारी आसनस्थ झाले आहेत. ते तरी अजून शांत का आहेत? तातडीची नड म्हणून या रस्त्यावर केव्हाच डांबर पडायला हवे होते.