जत, प्रतिनिधी ;भाजप सरकार हे अॉनलाईन सरकार आहे. जनतेसमोर थेट जाण्याचे त्यांच्यात धाडस नाही. यवतमाळपासून काेल्हापूरपर्यंत शेतकऱ्यांना एक रूपयाचीही कर्जमाफी मिळली नाही. तरीही मुख्यमंत्री ट्वीटरवरून फक्त टिवटिव करित आहेत, अशी टीका माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ थोरल्या वेशीतील मारूती मंदीरासमोर सभा घेण्यात आली. यावेळी डॉ. मनोहर मोदी यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. सभेस ताजुद्दीन तांबोळी, काेल्हापूरचे माजी महापौर आर. के. पवार, माजी सभापती मन्सूर खतीब, रमेश पाटील, उपसभापती शिवाजी शिंदे, डॉ.पराग पवार, रशिद पटाईत, उत्तम चव्हाण, ज्योत्स्ना पवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शबाना इनामदार, प्रा. हेमंत चाैगुले, स्वप्निल शिंदे, अविनाश वाघमारे आदी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, भाजपची चिंता करू नका. त्यांची फक्त दीड वर्ष राहिली आहेत. पुन्हा आपलेच सरकार येणार आहे.
राष्ट्रवादीच्या माध्यमातून जतचा चौफेर विकास करण्याची जबाबदारी सुरेश शिंदे यांच्याकडे दिली आहे. त्यांच्यामागे सर्व ताकद उभी करू.
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस हे बोलतात ते कधीही करित नाहीत. काळा पैसा थेट खात्यावर जमा करतो. अशी थाप मारून निवडून आल्यावर मात्र पलटी मारली.
शिंदे म्हणाले, सध्याची काँग्रेस ही कदम यांची खासगी कंपनी आहे. दादांची काँग्रेस कधीच संपली आहे. आता जत शहरात फक्त राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे.






