हवा, पाणी, माती अशा प्रत्येक ठिकाणी वाढत्या प्रदूषणाबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केली जात आहे. विविध संशोधन संस्था याबाबतीत सतत संशोधन करत असतात आणि त्यांच्या आधारे त्यांचे संशोधन प्रकाशित करत असतात. याच मालिकेत शिकागो विद्यापीठाच्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स अंतर्गत केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की प्रदूषणाच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर आहे आणि येथील वाढत्या वायू प्रदूषणामुळे लोकांचे आयुर्मान सातत्याने कमी होत आहे. हा अभ्यास म्हणतो की जर वायू प्रदूषण नियंत्रित करण्यात यश मिळाले तर लोकांचे आयुष्य पाच ते सहा वर्षांनी वाढू शकते.
असे इशारे देऊन दरवर्षी अनेक अभ्यास प्रकाशित केले जातात, मग असे वाटते की याचा गांभीर्याने विचार करून सरकार या दिशेने काही ठोस व्यावहारिक पावले उचलेल, परंतु वास्तव हे की इतर माहितीप्रमाणे या अभ्यासाचा डेटा फक्त थोडा वेळ चर्चेत राहतो आणि नंतर नाहीसा होतो. मात्र हिवाळा आल्यावर दिल्ली आणि इतर काही महानगरांमध्ये प्रदूषण पृथ्वीच्या पृष्ठभागाभोवती दाट होते आणि लोकांचा श्वासोच्छवास वाढायला लागतो तेव्हा कुठे सरकार थोडे फार हात -पाय हलवायला लागते.
आपल्या देशात प्रदूषणाची कारणे लपलेली नाहीत, परंतु सत्य हे आहे की सरकारांना ते दूर करण्याची इच्छाशक्ती नाही. केवळ महानगरांमध्येच नाही, तर आता लहान शहरांपासून ते खेड्यांमध्येदेखील हवेचे प्रदूषण प्रमाण पातळीपेक्षा बरेच जास्त राहू लागले आहे. याचे पहिले मोठे कारण म्हणजे वाहनांमधून निघणारा धूर. वाहनांच्या विक्री आणि खरेदीवर नियंत्रण ठेवावे, असा सल्ला अनेक वेळा देण्यात आला आहे. सार्वजनिक वाहने अधिक सुलभ आणि व्यावहारिक बनवा, असे सांगण्यात आले आहे. पण कोणत्याही सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही. जेव्हा वायू प्रदूषण घातक ठरू लागते, तेव्हा दिल्ली सरकार निश्चितपणे विषम-समान योजना लागू करते. बाकी कुठल्याच मोठ्या शहरांमध्ये याबाबत कसलेच प्रयत्न केले जात नाहीत.
या व्यतिरिक्त वायू प्रदूषणाचे दुसरे प्रमुख कारण कारखान्यांमधील, वीटभट्ट्यांमधून निघणारा धूर आहे. भारतात अजूनही विकसनशील अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे विकास कामे, औद्योगिक उत्पादन यावर विशेष भर आहे. जरी कारखान्यांसाठी प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित नियम आणि कायदे आहेत, परंतु त्यांच्यावर कठोर दक्षता न ठेवली जात नसल्यामुळे ते त्यांना टाळत राहतात. जरी आता बॅटरी आणि नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले जात असले आणि वाहनांमध्ये धुराचे पाण्यामध्ये रूपांतरित करणारी साधने बसवली जात असले तरी आता हे उपाय देखील प्रभावी सिद्ध होताना दिसत नाहीत.
आपले आयुर्मान कमी होण्यामागे फक्त वायू प्रदूषण हे एकमेव कारण नाही. ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. मातीमध्ये विरघळलेले विष, धान्य, फळे आणि भाजीपालाद्वारे आपल्या शरीरापर्यंत पोहचत आहेत आणि अनेक प्राणघातक रोगांना जन्म देत आहे. पाणी तर स्वच्छ केल्याशिवाय पिता येत नाही कारण आता देशात कुठेही पिण्यायोग्य पाणी राहिलेले नाही. वर्षानुवर्षे नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना चालू आहेत, पण त्यांचा काही विशेष परिणाम होताना दिसत नाही. या सर्व प्रकारच्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारांची उदासीनता आणि संबंधित विभागांची भ्रष्ट प्रथा. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारची दक्षता मुख्यतः फक्त पालापाचोळा जळणाऱ्या शेतकऱ्यांना आणि वाहनांच्या प्रदूषणाची पातळी तपासून त्यावर दंड आकारण्यापुरतीच मर्यादित दिसून येते. त्याची कृपादृष्टी मात्र मोठ्या प्रमाणात धुराची आग ओकणाऱ्या कारखान्यांवर राहत असते.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत