अबब..सालगड्याचे पॅकेज गेले लाखाच्या पुढे 

0
5
लातूर (मल्हारी शिंदे) : दरवर्षी गुढी पाडव्याच्या आधी शेतीचे नवे साल म्हणून सालगड्याचा शोध घेऊन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बोलणी केली जाते. मात्र, सालगड्याचे पॅकेज एक लाखाच्या पुढे गेल्यामुळे व लागोपाठ आलेल्या दुष्काळ ,  अतिवृष्टीमुळे  यावर्षी या परंपरेला तडा जाताना दिसत आहे. यावर्षी सालगडी ठेवण्यास शेतकरी उत्सूक नसल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून आले .शेतकऱ्यांसाठी गुढी पाडवा हा महत्त्वाचा सण आहे.

 

नवे शेतीचे वर्ष म्हणून शेतकरी नव्या वर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून करतात. सालगडी ठेवणे, शेतात नांगरण ,  पाळी आदी कामे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केली जातात. मात्र, यावर्षी शेतकरी सालगडी शोधण्याच्या प्रयत्नात दिसून आले नाहीत. सततच्या दुष्काळामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. लावलेला खर्चही शेतीतून निघालेला नाही. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी सालगडी ठेवण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले .
पूर्वी दरवर्षी शेतकरी गुढी पाडव्याच्या आगोदर शेती कामात निष्णात, हुशार, मेहनती, निर्व्यसनी व विश्वासू सालगड्याच्या शोधात असतात. गुढी पाडव्याला बोलणी केली जाते. मात्र याकडे अनेक शेतकऱ्यांनी सालगडी न ठेवता काही शेतकऱ्यांनी जमीन घरीच कसण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टीचे चटके शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहेत . चारा टंचाई मुळे शेतकरी  हैराण झाले आहेत . शिवाय पशुखाद्य महाग झाल्यामुळे शेतकऱ्यांना चाऱ्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे . पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंत्रयुगीन शेती महागडी झाली आहे . निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे शेतकऱ्यांना  अवघड झाले आहे . नापिकी व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे .
शेतकरी रमेश शिंदे 
२ ते ३ वर्षांपूर्वी गोडतेल , ज्वारी ,  दाळी , पेट्रोल ,  आधी वस्तूंचे भाव कमी होते . त्यामुळे आम्ही सालगडी म्हणून शेतकऱ्यांच्या शेतात ६० ते ७० हजार रुपये मध्ये वर्षभर कष्ट करायचो . मात्र सध्या सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आता गगनाला भिडले आहेत . त्यामुळे आता ६० ते ७० हजार रुपये मध्ये आमची उपजीविका भागत नसल्यामुळे आम्ही १ लाखाच्या पुढे पगार घेत आहोत . 
सालगडी उमाकांत कांबळे 
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here