वने आणि आपण

0
पृथ्वी,वने,जल,वायू,प्राणी-पक्षी ही सगळी आपली साधन संपत्ती आहे. या संपत्तीच्या जीवावर माणूस जगला आहे. त्याच्या आधारावरच त्याने स्वतः चा विकास साधला आहे.पण आता तोच माणूस त्यांच्या जीवावर उठला आहे, अशी परिस्थिती आहे. निसर्गाला तो ओरबाडत आहे.त्याचा नाश करत आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. त्यालाच ते धोकादायक ठरणार आहे.म्हणजे स्वतः च्या पायावर धोंडा मारून घेत आहे.मानवाने आगामी संकटे ओळखून राहिले पाहिजे.
माणूस हासुद्धा निसर्गाच्या विराट चक्रातील एक घटक आहे, तो या चक्रातील विविध घटकांकडून सतत काहीतरी घेत असतो. वने हाही त्यातलाच एक घटक आहे. त्यामुळेच वनांचं रक्षण आणि संवर्धन करणं अत्यावश्यक आहे, हे सर्वांच्याच मनावर बिंबवण्याचं काम करायला हवं  आहे.   आज जगभरच जंगलांसंदर्भात दोन गोष्टी बोलल्या जातात. एक, जंगलतोड आणि दोन, जंगलांची कमी होत असलेली गुणवत्ता. जंगलातील वनसंपदा, तेथील अन्य सजीवसृष्टी, तेथील जमीन या साऱ्यांचा विचार करून जंंगलाची गुणवत्ता ठरवली जाते. आपल्या देशातील जंगलांची गुणवत्ता या निकषांवर तपासून पाह्यला हवी. दुसरं असं की, वृक्षतोड आणि जाणीवपूर्वक आग लावून जंगल नष्ट करणं यातून जंगलांचा झपाट्यानं ऱ्हास होतो. जंगलांचा असा विचार करण्याचं कारण म्हणजे  जंगलांना मानवी संस्कृतीच्या संदर्भात फार मोठं महत्त्व आहे. माणूस कितीतरी गोष्टी जंगलांतूनच घेत असतो. माणूस नावाच्या ‘प्राण्या’ला ‘मानवी’ अस्मिता मिळण्याच्या अगोदरही तो जंगलांवरच अवलंबून होता आणि आजही तो तसाच अवलंबून आहे.
Rate Card
माणसाला सहजसाध्य असणाऱ्या पिण्यायोग्य पाण्यातील तीनचतुर्थांश पाणी हे आपल्याला जंगलांतूनच मिळतं. तिथल्या पाणी साठण्याच्या नैसगिर्क जागा याबाबत मोठी कामगिरी बजावतात.     जंगलांमुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरायला मदत होते. जमिनीची धूप थांबते. कडे कोसळण्याचे प्रकारसुद्धा जंगलंच रोखून धरतात.      आपल्याकडं ‘देवराई’ असण्याची पद्धत आहे. देेवराई असलेल्या भागातील हिरवळ वर्षभर टिकून असते आणि तिथल्या पाण्यालाही कधीही खळ पडत नाही. कोकण  परिसरातील देवराई, तिथलं घनदाट जंगल, पायाच्या घोट्यापर्यंत येणारा तिथल्या भूभागावरील झाडपाला, तिथल्या लता आणि वेली आणि भर दुपारी बारा वाजताही सूर्याची किरणं जमिनीपर्यंत आणू न देणारी तिथली हिरवीगर्द झाडी पाहिली की देवराई ही त्या परिसरातील मानवीवस्तीसाठी किती मोलाची कामगिरी बजावत असते, याचा साक्षात्कार होतो.

 

     गेल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये प्रदूषणाची, वातावरणात वाढत असलेल्या कार्बन डायऑक्साईड वायूच्या प्रमाणाची आणि त्यामुळं तापत जाणाऱ्या हवेची चर्चा सुरू झाली. या पृथ्वीवरील बहुरंगी जीवनातील चकित करणारी विविधता कमी होत असल्याची चर्चाही गेल्या शतकाच्या उत्तरार्धातच केली जाऊ लागली. ही विविधता कायम राखण्यात आणि हवामानातील बदलांचे प्रमाण  कमी करण्यात जंगलंच मोठी भूमिका बजावत असतात. म्हणजेच शुद्ध हवा आणि पाणी, जैविक बहुविधता आणि परिसंस्थेचं ‘आरोग्य’ या गोष्टींसाठी जंगलं अत्यावश्यक असतातच; शिवाय जंगलांतच अनेक औषधी वनस्पती असतात. आजारी पडल्यावर चिम्पांझी काय खातात, याचं निरीक्षण करून माणसानं अनेक औषधी वनस्पती शोधून काढल्या. आयुवेर्दानं तर याबाबत मोलाचं काम केलं आहे. माणसाला आजारपणातून बरा करण्यासाठी लागणारी औषधं देणाऱ्या जंगलांबाबत कृतज्ञताच असायला हवी. आधुनिक विज्ञान तर जंगलांपासून स्फूर्ती घेऊन कितीतरी विविध प्रयोग करत आहे.

 

     वनस्पतीची पानं प्रकाश संश्लेषणानं स्वत:चं अन्न तयार करतात. तेच तत्त्व वापरून सौरऊर्जा तयार करण्यासाठी लागणारा ‘सोलर सेल’ तयार करण्यात अलीकडंच यश आलं आहे. या तंत्रामुळं प्रचलित पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या सिलिकॉनपासून आणि म्हणूनच त्यापासून तयार होणाऱ्या त्रासदायक कचऱ्यापासून सुटका होणार आहे. आता तयार करण्यात आलेली ‘कृत्रिम पाने’ इमारतींच्या खिडक्यांमध्येही बसवता येतील आणि त्यापासून सौरऊर्जा मिळवता येईल, असा दावा केला जात आहे. हायड्रोजन वायूचा उपयोग करून आपल्याला पर्यायी ऊर्जा मिळवता येईल आणि एक दिवस ती रॉकेल, डिझेल, कोळसा यांची जागा घेईल, असा विश्वास व्यक्त केला जातो. त्याबाबतही संशोधन सुरू आहे. वनस्पतींची पानं उत्प्रेरकांच्या मदतीने ऑक्सिजनपासून हायड्रोजन वेगळा करतात, यापासून प्रेरणा घेऊन संशोधकांनी आता तीच रासायनिक अभिक्रिया कृत्रिम पानाद्वारे करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आपल्यासह नांदणाऱ्या वनसृष्टीकडून माणूस असं नवीन काही शिकत आहे. हे सारं लक्षात घेतलं तर माणूस हा वनस्पतींवर आणि म्हणूनच जंगलांवर किती अवलंबून आहे, ते कळतं. त्यांचं रक्षण करणं सार्वत्रिक हिताचं आहे, याचाही साक्षात्कार होतो. त्यातूनच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या तुकाराम महाराजांच्या सांगण्याला एकविसाव्या शतकात नवं परिणाम लाभलं आहे, हे जाणवतं. आताच्या काळातला अर्थ  प्रत्येकाच्याच मनात खोलवर रुजायला हवा; कारण त्यातूनच माणसाला नव्या युगाला समर्थपणे सामोरे जाण्याचे बळ मिळेल.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.