विषामध्ये विरघळत चालले जीवन आणि झपाट्याने बिघडते आरोग्य (जागतिक आरोग्य दिन विशेष)

0

आज आपण ज्या आधुनिकतेची फुशारकी मारतो आणि आपण ज्या वातावरणात गुदमरल्यासारखे राहतो, ते वातावरण एखाद्या मंद विषासारखे आहे जे आपले शरीर कमकुवत करून आपल्याला गंभीर आजारांनी मारून टाकते. मंद विष म्हणजे प्रदूषण, वाढते काँक्रीटचे जंगल, भेसळ, नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण, कमी होत जाणारे वनक्षेत्र, वाहने आणि यांत्रिक उपकरणांचा अतिवापर, मादक पदार्थांचे व्यसन, घोंघाटा, प्लास्टिक आणि घातक रसायनांचा वाढता वापर, ई-कचरा, वैद्यकीय कचरा, अशुद्धता अशा समस्यांशी आहे, ज्यामुळे पर्यावरण प्रदूषित होऊन आरोग्यास समस्या निर्माण होतात. आपल्यावर कोणी थेट हल्ला केला किंवा इजा केली तर आपण त्याचा तीव्र विरोध करतो, पण अप्रत्यक्षरीत्या म्हणजे भेसळ किंवा प्रदूषणाने, कोणी आपल्याला मारले तरी, आपण बहुतेक मूकपणे सहन करतो. अप्रत्यक्षपणे प्रदूषणाचे विष प्राणघातक रोग निर्माण करून आपला जीव घेते.

चांगल्या आरोग्याला चालना देऊन प्रत्येक माणसाला उत्तम उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आणि जगभरातील आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देऊन आरोग्य कल्याणाच्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ०७ एप्रिल १९४८ रोजी करण्यात आली. यावर्षी २०२३ ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ०७ एप्रिल दिवशी “जागतिक आरोग्य दिन” जगभरात आरोग्य-सुविधा आणि जनजागृतीच्या रूपात साजरा केला जातो. या वर्षीची थीम “सर्वांसाठी आरोग्य” आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार:- जगभरातील सुमारे ९३० दशलक्ष लोक आरोग्यावर घरगुती बजेटच्या १०% किंवा त्याहून अधिक खर्च केल्यामुळे गरिबीत जाण्याचा धोका आहे. उद्योग, वाहतूक, कोळसा ऊर्जा प्रकल्प आणि घरगुती इंधनाचा वापर यांचे वायू प्रदूषणात मोठे योगदान आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा हस्तक्षेप वाढवल्यास २०३० पर्यंत ६० दशलक्ष लोकांचे जीव वाचू शकतो आणि सरासरी आयुर्मान ३.७ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. यासाठी ३७० अब्ज डॉलर अतिरिक्त गुंतवणूक आवश्यक आहे.

 

प्रदूषित हवा श्वास हिसकावून घेते :- आपण श्वास घेत असलेली हवा धोकादायकरित्या प्रदूषित होत आहे, आता दहापैकी नऊ लोक प्रदूषित हवेत श्वास घेतात, ज्यामुळे दरवर्षी ७ दशलक्ष अकाली मृत्यू होतात. वायू प्रदूषणामुळे पक्षाघात, फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू होतात. घरगुती वायू प्रदूषणामुळे वर्षाला ४ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. जगभरात, ५ ते १८ वयोगटातील १४% मुलांना वायू प्रदूषणामुळे दमा होतो. दरवर्षी, ५ वर्षांखालील ५४३,००० मुले वायू प्रदूषणाशी संबंधित श्वसन रोगांमुळे जीव गमावतात. द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, २०१९ मध्ये प्रदूषणामुळे भारतात २.३ दशलक्ष अकाली मृत्यू झाले. सुमारे १.६ दशलक्ष मृत्यू केवळ वायू प्रदूषणामुळे झाले आणि ५००,००० हून अधिक जल प्रदूषणामुळे झाले. आवर वर्ल्ड इन डेटा च्या वेबसाईटवर नुकतेच प्रकाशित रिपोर्ट्सनुसार, भारताने २०१५ ते २०२० पर्यंत ६८४०००० हेक्टर जंगल गमावले, ९८ देशात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रदूषित वातावरणाचा सर्वात वाईट परिणाम खालच्या वर्गातील लोकांवर होतो कारण उच्च राहणीमान परवडत नाहीत त्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.

 

एअर क्वालिटी लाइफ इंडेक्सनुसार :- भारत आज जगातील सर्वात प्रदूषित देशांपैकी एक आहे. वायू प्रदूषणामुळे जागतिक आयुर्मान सुमारे २.२ वर्षांनी आणि भारतात सरासरी आयुर्मान ६.३ वर्षांनी कमी होते, देशातील काही भागात सरासरीपेक्षा वाईट परिस्थिती आहे, अशा भागात आयुर्मान १० वर्षांपेक्षा कमी आहे. थेट सिगारेटच्या धुराच्या संपर्कात आल्याने जागतिक सरासरी आयुर्मान अंदाजे १.९ वर्षे कमी होते. भारत वायू प्रदूषणासाठी डब्ल्यूएचओ ने ठरवलेल्या मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरतोय, देशात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. भारतातील सुमारे ७०% भूपृष्ठावरील पाणी मानवी वापरासाठी अयोग्य आहे. दररोज, सुमारे ४० दशलक्ष लिटर सांडपाणी नद्या आणि इतर पाण्याच्या स्रोतात प्रवेश करते. वाढत्या शहरीकरणामुळे जलसाठेही विषारी होत आहेत. संगणक, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सच्या वाढत्या वापरामुळे जागतिक स्तरावर ई-कचऱ्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. ग्लोबल ई-वेस्ट स्टॅटिस्टिक्स पार्टनरशिप (जीईएसपी) नुसार, २०१९ पर्यंत गेल्या पाच वर्षांत त्यात २१% वाढ झाली आहे.

 

Rate Card

वाढती भेसळ :- अन्न नियामकाने २०२१-२२ मध्ये १४४,३४५ नमुन्यांचे विश्लेषण केले, त्यापैकी ३२,९३४ एफएसएस कायदा, २००६ आणि नियमांनुसार विहित केलेल्या मानकांचे उल्लंघन करताना आढळले. भेसळयुक्त अन्न विषारी असते, ज्याचा थेट आरोग्यावर परिणाम होतो आणि मनुष्याला विकासासाठी आवश्यक योग्य पोषक तत्वांपासून वंचित ठेवले जाते. सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की काही भेसळयुक्त अन्न हे जीवघेण्या रोगांचे स्त्रोत आहेत ज्यामुळे अवेळी महागड्या आजाराने वेदनादायक मृत्यू होतो. वैद्यकीय विज्ञानाच्या जर्नलनुसार, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनामुळे भारतात दरवर्षी सुमारे २ दशलक्ष मृत्यू होतात.

 

आज प्रदूषित हवा, पाणी, अन्न म्हणजे जीवनाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टीच निकृष्ट दर्जाच्या झाल्या आहेत, त्यामुळे आरोग्य चांगले कसे राखायचे, हा गंभीर प्रश्न आहे, ह्या समस्येकरिता सध्या आपली जीवनशैली सर्वाधिक जबाबदार आहे. आपल्या आरोग्यासाठी चांगले स्वास्थ्यवर्धक पदार्थ नाकारून आपण जिभेच्या चवीनुसारच पदार्थ निवडतो. चरबीयुक्त, पचनास जड, मसालेदार, तळलेले, गोड, खारट अशा पदार्थांना जास्त मागणी असते. आजच्या पिढीला बाहेरचे पदार्थ जसे जंक फूड, फास्ट फूड जास्त आवडतात त्यामुळे आता स्ट्रीट फूडचा ट्रेंड खूप वाढला आहे. प्रत्येकाला तयार उत्पादने हवी असतात, घरच्या घरी सुद्धा कष्ट व्हायला नको. जीवनशैलीनुसार आता लोक सहजपणे आजारांना बळी पडतात. आज कोणत्याही वयात कोणीही कोणत्याही रोगाला बळी पडून आपला जीव गमावतो. हे का होत आहे ह्या समस्या कधी आपण लक्षात आणल्या आहे? याचे मुख्य कारण म्हणजे विषारी वातावरण आणि आपले अज्ञानपण. आधुनिकतेमुळे इतरांवरील आपले अवलंबित्व वाढले आहे, यांत्रिक साधनांशिवाय आपण आज जगू शकत नाही.

 

खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागणारे पॅकेजिंग साहित्य अधिकाधिक बाहेरून खरेदी करायला आपल्याला आवडते, जेव्हाकी हे साहित्य बनवताना त्या वस्तूंना अनेक प्रक्रियेतून जावे लागते. त्यामुळे त्यामध्ये अनेक रसायने आढळतात, ज्यामुळे त्या पदार्थातील मूलभूत पोषक घटक कमी होऊन शरीराला हानी पोहोचते. धान्य सुद्धा पॉलिश करून विकत घेतले जाते कारण ते धान्य दिसायला चमकदार दिसते. आज आपल्या जीवनात रसायनांचा वापर सर्वत्र उच्च पातळीवर आहे. शेतात रसायने, फळे पिकवायला व साठवणीत रसायने, खाण्यापिण्याचा पदार्थात म्हणजे सगळीकडे रसायनांचा वापर दिसतोय. भेसळ इतकी सर्रास आहे की कोणत्याही अन्नपदार्थाच्या शुद्धतेची हमी देणे कठीण आहे.

 

जागरुकता आणि सावधगिरी आवश्यक :- पॅकेज केलेले पदार्थ, शीतपेये, फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न यांचे सेवन कमी करा. उच्च-फ्रुक्टोज कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर्स, ट्रान्स फॅट, कृत्रिम अन्न रंग, मोनोसोडियम ग्लूटामेट, सोडियम नायट्रेट, परक्लोरेट, फॅथलेट्स, बिस्फेनॉल्स, बीपीए, सोडियम बेंझोएट आणि पोटॅशियम बेंझोएट, ब्यूटिसाइलेटेड असे पदार्थ विविध खाद्यपदार्थांमध्ये मिसळले जातात, जे आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक असतात. अशा गोष्टी नेहमी टाळल्या पाहिजेत. उष्णतेमुळे बीपीए आणि थैलेट प्लॅस्टिकमधून अन्नामध्ये प्रवेश करू शकतात, त्यामुळे प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न किंवा पेये साठवणे टाळा. प्लास्टिक ऐवजी काच आणि स्टेनलेस स्टीलचा वापर करा. अन्न हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा आणि सर्व फळे आणि भाज्या पूर्णपणे स्वच्छ करा.

आरोग्य हीच संपत्ती आहे, चांगल्या आरोग्यासाठी जागरूकता आणि जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. निरोगी शरीरासाठी, देखावा आणि आधुनिक जीवनशैली सोडून देणेच चांगले. आधुनिक विचारांनी बनावे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी धोरण-नियम, सूचनांचे काटेकोर पालन व्हायला हवे. यांत्रिक साधनांचा मर्यादित वापर करा. जंगल समृद्ध करावे लागेल, जेणेकरून पर्यावरणाचे चक्र सुरळीत चालेल, ज्यामुळे जलस्रोत समृद्ध होतील, आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळेल, ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येत सुधारणा होऊन चांगली पिके मिळतील, नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमध्ये घट होईल. वन हा जीवनाचा आधार आहे, वृक्ष लागवडीला सातत्याने प्रोत्साहन देणे ही प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे.

 

डॉ. प्रितम भि. गेडाम

मोबाईल आणि व्हाट्सएप न. ०८२३७४ १७०४१

prit00786@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.