राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी आज महायुती सरकारमध्ये सामील होत राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
देशाला आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता फक्त आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठीच महायुती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय या सर्वांनी घेतला असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच त्यांच्या सोबत येण्याने डबल इंजिन सरकार यापुढे बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल असा आशावाद यावेळी बोलताना व्यक्त केला.
याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी वर्ग आदी उपस्थित होते.