जत : नागपूर येथे हिवाळी आधिवेशन दरम्यान जत तालुक्यातील २९ गावांसाठी तयार केलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना रद्द करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २९ गावांसाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात यावी यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आवाज उठविला. याबरोबरच जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली असून येणाऱ्या काळात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे सरकारने जनावरांसाठी चाराडेपो किंवा चाराछावणी त्वरित सुरू करण्याची मागणी देखील आ.सावंत यांनी याप्रसंगी केली.
जतसाठी खरीप पीक विमा द्यावा
जत : जत तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, विविध विभागाअंतर्गत देण्यात येणारे निधी त्वरित द्यावेत, जलसिंचनच्या सर्व योजना विनाशुल्क सुरु कराव्यात, कृषि विभागाच्या योजनांची बिले तातडीने जमा करावीत यासह खरीप पीक विमा आणि इतर बाबी विधानपरिषदेत आ.विक्रमसिंह सावंत यांनी हिवाळी अधिवेशनदरम्यान मांडल्या.
जनावरांचे लसीकरण करावे
जत : जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पशूपालन व्यवसाय करण्यात येत आहे.त्यामुळे दुधाळ जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्याचबरोबर जनावरांचे आजारही वाढत आहेत.त्यामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या लसीकरण संदर्भात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विधीमंडळ नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला.
तुबची-बबलेश्वरमधून पाणी द्यावे
जत : जतमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू असून या आवर्तनाची पाणीपट्टी टंचाई निधीमधून भरावी व कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी मिळणेबाबत तातडीने पावले उचलावीत अशी मागणी आ.विक्रमसिंह सावंत यांनी विधीमंडळात नागपूर अधिवेशन दरम्यान केली.