समस्त शाळकरी मुलांच्या वार्षिक परीक्षा संपून आता उन्हाळी सुट्टी पडली आहे. शहरी भागांत लहान मुलांना एरव्ही शाळेत सोडले की गृहिणींना घरातील कामे करण्यास मोकळा वेळ मिळत असे. आता मात्र संपूर्ण दिवस मुले घरी असल्याने त्यांना काय हवे आणि काय नको याची पूर्तता करण्यामध्ये त्यांची पुरती दमछाक होत आहे. ज्यांची गावाला घरे आहेत ती कुटुंबे दरवर्षी गावाला जातात; मात्र ज्यांची नाहीत त्यांना मात्र काही पर्याय नसतो. यंदा उन्हाचा तडाखा खूपच असल्याने दुपारी मुलांना घराबाहेर खेळायलाही पाठवता येत नाही अशावेळी घरी त्यांचे हट्ट पुरवण्याचा त्रास नको म्हणून गृहिणी आपले मोबाईल मुलांच्या स्वाधीन करतात किंवा टीव्ही चालू करून देतात.
त्यावर ही मुले दिवसदिवसभर गेम्स खेळत असतात किंवा रिल्स बघत असतात. मुलांची ग्रहणक्षमता अधिक असल्याने ते जे पाहतात त्याचा परिणाम त्यांच्या कोवळ्या मनावर पटकन होतो. इंटरनेट विश्वात अनेक हिंसक गेम्सही आहेत. हे गेम्स पाहून तशा कृती ही मुले करण्याचा प्रयत्न करतात, गेम्समधील आभासी पात्रांना ते आपले आदर्श मानू लागतात. सातत्याने गेम्स पाहणारी मुले अधिक हिंसक किंवा भित्री होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी संशोधनातून सिद्ध केले आहे. कार्टून्स पाहून ते तशाच प्रकारच्या हालचाली करू लागतात. याखेरीज मुलांच्या कोवळ्या डोळ्यांवर या मोबाईल्स आणि टीव्हीच्या किरणांचा परिणाम होऊन त्यांची दृष्टीक्षमता अल्प होते. यासाठी मुलांना मोबाईल किंवा टीव्हीचा नाद लावण्याऐवजी त्यांना विविध संस्कार, क्रीडा आणि शौर्य शिबिरांना पाठवा. त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांच्याकडून श्लोक पाठांतर करून घ्या. देवतांचे अवतार, क्रांतिकारक, समाज सुधारक यांच्या कथा आणि जीवन चरित्रे त्यांना सांगा. एरव्ही शाळा, शिकवण्या आणि अभ्यासात गुंतलेल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांकडे हाच कालावधी असतो. हा वेळ मुलांना द्या !