‘भारत गौरव’ डॉ. जयंत आठवले
भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांच्या जागतिक प्रसारासाठी केलेल्या अद्वितीय योगदानाविषयी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांना यंदाचा मानाचा ‘भारत गौरव पुरस्कार’ घोषित झाला. ‘संस्कृती युवा संस्थे’च्या वतीने ५ जूनला फ्रान्सच्या संसदेत पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सौ. बिंदा सिंगबाळ आणि सौ. अंजली गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डॉमिनिक थिओफिल, मेहेंदीपूर बालाजी ट्रस्टचे श्री नरेश पुरी महाराज, ‘संस्कृती युवा संस्थे’चे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा आणि फ्रेंच संसदेचे सदस्य फ्रेडरिक बुवेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जागतिक स्तरावरील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘भारत गौरव पुरस्कार’ सोहळा या पूर्वी ‘युनायटेड किंगडम हाऊस ऑफ कॉमन्स’ (ब्रिटन), संयुक्त राष्ट्र्रे आणि अटलांटिस आणि दुबई, अशा प्रतिष्ठित ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या वेळी फ्रान्समधील सिनेटमध्ये हा सोहळा पार पडला. जागतिक कीर्तीचे संमोहन उपचार तज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले डॉ. आठवले यांनी १५ वर्षे संमोहन-उपचारतज्ञ म्हणून संशोधन केल्यावर काही रुग्ण नेहमीच्या औषधोपचारांनी बरे होत नाहीत पण तीर्थक्षेत्री किंवा संतांकडे गेल्यामुळे वा धार्मिक विधी केल्यामुळे बरे होतात, असे त्यांच्या लक्षात आले. यामुळे ‘अध्यात्मशास्त्र’ हे उच्च प्रतीचे शास्त्र आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जिज्ञासू वृत्तीने अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला, अनेक संतांकडे जाऊन शंकानिरसन करून घेतले आणि स्वतः साधना केली. १९८७ साली इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांना गुरुमंत्र दिला. अध्यात्माचा प्रसार गावोगावी करण्यासाठी १९९९ साली त्यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. आज लाखो साधक सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक साधना करत आहेत, तर अनेक हिंदुत्वनिष्ठ संस्था आणि संघटना सनातनच्या आध्यात्मिक कार्याशी जोडल्या गेल्या आहेत. गुरूंनी सांगितलेली धर्मप्रसार आदी सेवा पुष्कळ अडथळे येऊनही आज्ञापालन म्हणून ते करत आहेत. प्राणशक्ती अत्यल्प असूनही गुरूंनी ग्रंथलिखाणासाठी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे, दिवसातील बहुतांश वेळ ते ग्रंथ लिखाणाचे कार्य गुरूंची सेवा म्हणून करत असतात. संतांसमोर शिष्यभावात वावरणे, जिज्ञासू वृत्ती, आध्यात्मिक संशोधन करणे, व्यक्तीगत जीवन विरक्त भावाने जगणे, वेळेचा विनियोग करणे, प्रीती, काटकसर, इतरांचा विचार करणे, समाजातील घटनांकडे संवेदनशीलतेने पहाणे ही त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)