सांगली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करत काँग्रेसने जत विधानसभा मतदारसंघांतील दोन बूथच्या तर सांगली विधानसभा मतदार संघातील १० बुथच्या मत पडताळणीची मागणी केली आहे.
त्यासाठी जतमधून उमेदवार विक्रमसिंह सावंत,सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे.
या जिल्ह्यातील १२ बुथच्या मत पडताळणीसाठी तब्बल पाच लाख ६६ हजार ४०० रुपये निवडणूक विभागाकडे जमा केले आहेत.विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त केला आहे.
निवडणूक विभागाच्या नियमानुसार, एका बूथच्या मत पडताळणीसाठी ४७ हजार २०० रुपये शुल्क भरावा लागतो. जतमध्ये विक्रमसिंह सावंत यांनी दोन बूथच्या पडताळणीची मागणी करून ९४ हजार ४०० रुपये भरले आहेत. सांगलीत पृथ्वीराज पाटील यांनी दहा बूथच्या पडताळणीची मागणी करत चार लाख ७२ हजार रुपये भरले आहेत.
निवडणूक विभागाच्या नियमानुसार, या दोन्ही उमेदवारांनी कोणत्या बूथबाबत शंका आहेत, त्या यंत्रांचे क्रमांकही सादर केले आहेत. त्यासाठी एक तज्ज्ञ प्रतिनिधी सुचवण्यात आला आहे. ही प्रक्रिया कधीपर्यंत पार पाडली जाईल, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार, एकूण मतदान यंत्रांच्या पाच टक्के यंत्र व चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाऊ शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार त्याची मागणी करू शकतात.
जत विधानसभा मतदारसंघातील दरीबडची येथील बुथ नंबर २२०, २२१ केंद्रांवरील बूथची तर सांगली विधानसभा मतदारसंघातील बुथ नंबर १५, २०, ७२, ९७, १३८, १९०, २४२, २७७, २९४, ३१३ बुथवरील मतपडताळणीची मागणी काँग्रेसने केली आहे.त्यानुसार निवडणूक आयोगाकडून मतपडताळणी होणार आहे.पुन्हा यंत्र व चिठ्ठ्यातील मते पडताळली जाणार आहे.ती प्रक्रिया कभी पार पाडली जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.निवडणूक विभागाकडून यासाठी तयारी करण्यात येत आहे.