भाजपच्या भूलथाफाना बळी पडू नका ; विक्रम ढोणे
जत,संकेत टाइम्स : पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेतेमंडळी धनगर समाजाला भुलवण्यासाठी भाकडकथा सांगत आहेत. धनगर समाजातील दलाल पुढे करून एसटी आरक्षणासंबंधी पुर्णपणे खोटी माहिती दिली जात आहे.
भाजपच्या या षढयंत्राला, तसेच इतर आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या गल्लीबोळातील कार्यकर्त्यांबरोबरच राज्य पातळीवरील नेतेमंडळींकडून धनगर आणि धनगड एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिल्याचे सांगून दिशाभूल सुरू आहे.

दीड वर्षापासून हा प्रकार सुरू असून त्यांना आम्ही वेळोवेळी उघडे पाडले आहे. तरीही भाजपकडून खोटे रेटून बोलण्याचा प्रकार सुरू आहे. धनगर आणि धनगड एकच असल्याचे कोणतेही प्रतिज्ञापत्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात दिलेले नाही आणि मोदी सरकारने धनगर आरक्षणाच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे, हीच वस्तुस्थिती आहे. ही सत्यस्थिती समाजाने समजावून घ्यावी.
दोन वर्षांपुर्वी समाजाली दोन ठगांनी अखेरचा लढा या नावाखाली समाजाची घोर फसवणूक केली आहे. त्यातील एक ठग भाजपचा तर दुसरा महाविकास आघाडीचा प्रचार करतो आहे. त्यामुळे समाजाने सर्वंकष विचार करून आपल्या पसंतीनुसार निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन ढोणे यांनी केले आहे.