शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडणार
जत,संकेत टाइम्स: कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असल्याने जत शहरासह तालुक्यातील आठवडा बाजार बंद झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण पुन्हा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. भाजीपाला व फळे विक्री थांबल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसणार आहे. जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजार पंधरा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे जत तालुक्यातील जत शहर, माडग्याळ, डफळापूर, शेगाव, बिळूर, संख, उमदी, दरीबडचीसह सर्व बाजार बंद झाले आहेत.
तालुक्यात गत वर्षी पावसाच्या कृपादृष्टीमुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला, द्राक्षासह, कलिंगड, चिकू, केळी आदी फळ, पिके घेतली आहेत. यातून आर्थिक उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा असतानाच कोरोना आजाराने पुन्हा डोके वर काढले.
त्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी द्राक्ष पिकाचे दर पडण्यास सुरवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तडजोड करण्याची पाळी आली. त्यानंतर आता आठवडा बाजार बंद झाल्याने
ग्रामीण शेतकऱ्यांचे अर्थकारण ढासळले आहे. द्राक्षे, कलिंगड तसेच भाजीपाला शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन अल्पदरात विकावा लागतो आहे.