जत,संकेत टाइम्स : शेड्याळ (ता. जत) येथे दारू दिली नाही म्हणून झालेल्या मारहाणीतील एकाचा मुत्यू झाल्याचा दुर्देवी घटना घडली आहे. गावातीलच दहा जणांच्या जमावाने घरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले होते. या हल्ल्यात बादल रमेश चव्हाण (वय २७)गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सांगली येथे
खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बादल यांचे निधन झाले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जत पोलीसांनी खूनाचे कलम वाढविले आहे.
दरम्यान, या घटनेने गावात मोठा तणाव आहे. परिणामी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या कारणास्तव जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जत उपविभागीय पोलीस कार्यालयास भेट देऊन परिस्थिती माहिती घेतली. या घटनेची कसून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दारूची बाटली दिली नाही, म्हणून सागर चव्हाण यांच्या घरावर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास गावातील १० जणांनी दगडफेक केली होती. घरातील फ्रीज, टीव्ही व घराबाहेर लावलेल्या दोन मोटारसायकली जाळल्या होत्या.घरातील बादल रमेश चव्हाण, सागर रमेश चव्हाण, आकाश रमेश चव्हाण यांना जबर मारहाण करण्यात आली होती. सागर व आकाश हे पळून गेल्याने बचावले. जमावाच्या ताब्यात सापडलेल्या बादल यास शेडयाळचे माजी सरपंच अशोक पाटील, चंदू गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी,मास्तर तेली व अन्य अनोळखी पाच जणांनी बेदम मारहाण केली होती.त्यात तो गंभीर जखमी झाला होता. जखमी बादलवर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, पोलिसांनी माजी सरपंच अशोक पाटील,चंदू गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अन्य अनोळखी पाच जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.आता बादल यांचा मुत्यू झाल्याने खूनाचे कलम वाढविण्यात आले आहे.