विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचं आव्हान?
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्यांत असलेल्या सहा प्रमुख पक्षांव्यतिरिक्त महाराष्ट्रात आता अनेक उपप्रादेशिक पक्षसुद्धा निर्माण झालेले आहेत. हे पक्ष एखादा जिल्हा किंवा तालुक्यापुरते सीमित आहेत. या उपप्रादेशिक पक्षांचे प्रभावक्षेत्र जरी छोटे असले तरी हे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील यात शंका नाही. ही विधानसभा निवडणूक एवढी अटीतटीची होणार आहे की दोन- चार आमदार संख्यासुद्धा ऐनवेळी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच या उपप्रादेशिक पक्षांची आता खास दखल घ्यावी लागत आहे. या पक्षांत आमदार बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वराज्य संघटना प्रमुख संभाजीराजे असे अनेक पक्ष आहेत. या पक्षांव्यतिरिक्त प्रकाश आंबेडकरांची ‘वंचित बहुजन आघाडी’, ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर,भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे हे नेते आहेत. हे नेते एकत्र येऊन राज्यात ‘तिसरी आघाडी’ स्थापन करण्याच्या च्या विचारात आहेत. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील ओला दुष्काळ भागाचा एकत्रित दौरासुद्धा केला होता.