नाशिक शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरालगतच्या विल्होळी परिसरात भरदिवसा घडलेल्या एका थरारक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (१३ एप्रिल) मुंबई-आग्रा महामार्गालगत एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे हा हल्ला एका महिलेने केल्याचे समोर आले असून, संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मृत तरुणाचे नाव सूरज सोळंकी असून तो कुंभारवाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेल्या महिलेने अचानक समोर येत कोयत्यासारख्या शस्त्राने त्याच्यावर सलग वार केले. हल्ला इतका भीषण होता की सूरजचा जागीच मृत्यू झाला.
घटनेदरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या एका वाहनातील प्रवाशाने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही निर्माण झाली आहे.
हल्ल्यानंतर आरोपी महिला एका दुचाकीवरून पसार झाली. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, आरोपींनी दुचाकीची नंबर प्लेट कपड्याने झाकून ठेवली होती. यावरून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, वैमनस्यातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमध्ये सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांचा सुरक्षेवरील विश्वास डळमळीत होत आहे. भरदिवसा महामार्गावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
सूचना: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती शेअर करू नये.




