जत,प्रतिनिधी : व्यवसायिक शेतकरी आत्महत्यांपैकी बऱ्याच आत्महत्यांमागील कारण खासगी सावकारांकडून घेतलेली कर्जे आणि त्यापायी आलेली हतबलता हे आहे. राज्यात सावकारी नियमनाचा कायदा आहे, पण पुढाऱ्यांनी पोसलेल्या सावकारांना आजही धरबंध नाही.. बँकिंग व्यवस्थेतून शून्य टक्के दराने पतपुरवठा, हा यावरील एक उपाय ठरू शकतो.
जत तालुक्यात पोलीस निरिक्षक रामदास शेळके यांच्या काळात काही प्रमाणात कमी झालेली सावकारी,पुन्हा फोफावली असून अव्वाच्या सव्वा व्याज आकारून लुटणाऱ्या या सावकाराच्या टोळीमुळे जत शहरासह तालुक्यातील अनेक शेतकरी,व्यवसायिक, सामान्य नागरिक हातबल झाले आहेत.
शहरातील काही सावकाराचे चार चार पट रक्कम परत देऊनही कर्जे फिटत नाही.इतकी पटाणी व्याज आकारणी आकारली जात आहे.जत,उमदी पोलीस ठाण्यात शेकडो गुन्हे दाखल होऊनही सावकारी तसूभरही कमी झाली नाही.पुन्हा नवे,सावकार समोर येत आहेत.या खासगी सावकारांच्या जाळ्यात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, लहान मध्यम व्यापारी आदी वर्ग अडकलेला आहे. सावकारीचा फास दिवसेंदिवस आवळत चाललेला आहे.
खासगी सावकारी कशामुळे फोफावली याकडे आपण बारकाईने पाहिले पाहिजे. मुळात आपली बँकिंग व्यवस्थाच याला जबाबदार आहे. आजकाल बँकांत सर्वसामान्य वर्गाला कर्ज मिळणेच मुश्कील झाले आहे. कागदपत्रे गोळा करा, ना हरकत दाखले गोळा करा, बँकेची पायरी झिजवा, त्यानंतर वशिलेबाजी आली. मग एक लाखाच्या कर्जाला 10 लाखांची मालमत्ता तारण द्यायची. त्यानंतरही त्याला कर्ज मिळेल याची शाश्वती नाही. कर्ज मिळेल असे वाटले की, बँकेचा अधिकारी आडवा पाय मारलेलाच असतो.
टक्केवारीसाठी त्या संबंधिताला अक्षरश: रडकुंडीस आणतो. टक्केवारी ठरल्यावर मग त्याच्या हातात कर्जाचा पसा येतो. तथाकथित कर्जबुडवे पसे देऊन सहज कर्ज घेतात व बुडवतातही. एवढय़ा सगळ्या प्रक्रियेतून जाण्यापेक्षा शेतकरी नाइलाजाने हा खासगी सावकाराकडे वळून त्याच्या अलगद जाळ्यात अडकला जातो. अवाच्या सवा दराने व्याजाची आकारणी केली जाते. आज प्रत्येक गावात नि शहरात खासगी सावकारांचा हा धंदा फोफावला आहे.