मंडल अधिकारी मोरे यांच्यावर कारवाई करा | संजय कांबळे यांचे पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन
जत,प्रतिनिधी : जतचे भ्रष्ट मंडलअधिकारी संदिप मोरे यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली.तसे निवेदन त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.पालकमंत्री यांनी यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना दिले.
कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,मंडल अधिकारी मोरे यांच्यावर कठोर कारवाई व त्यांना बडतर्फ करावे या मागणीसाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने येथिल उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले होते.परंतु अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.मंडल अधिकारी संदिप मोरे यांचे जत शहरासह तालुक्यातील वाळू माफियांशी घनिष्ठ संबंध आहेत.या सबंधातून वाळू माफीया लोक जत तालुक्यातील विविध ओढापात्रातील वाळूचा बेकायदेशीर उपसा करुन नैसर्गिक ओढ्याला मोठी हानी पोहचविण्याचे काम करित असून शासनाचेही कोट्यावधी रुपयांचे
नुकसान करित आहेत.
मंडल अधिकारी संदिप मोरे यांचे राजकिय नेतेमंडळी यांच्याबरोबर भागिदारीचे व्यवहार असल्याने व या भागीदारीतून त्यानी वाळू उपसा करण्यासाठी दोन डंपर ही आणले आहेत. मोरे हे स्व:ता वाळूचा बेकायदेशीर उपसा करित असून कुंपनच शेत खायला लागले तर न्याय कोणाकडे मागायचा अशी जत तालुकावासियांची अवस्था झाली आहे.मंडलअधिकारी श्री. संदिप मोरे हे बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणारे वाहतूकदाराना पाठीशी घालत असल्याने जत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौणखनिजाचे बेकायदेशीर व नियमबाह्य उत्खनन होत आहे.
जत शहरातील विविध प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात.आर.सी.सी.इमारतींची कामे सुरू आहेत. प्रशासन म्हणते जत तालुक्यात बेकायदेशीर व नियमबाह्य वाळू बंद आहे.मग शहरातील वाळूचे ढिगारे कुणाच्या मदतीने येत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टता करावी,असेही निवेदनात म्हटले आहे.तसेच मंडल अधिकारी नोंदीसाठी लाखो रुपयाची नागरिकांकडून मागणी करत आहेत,अशा अधिकाऱ्यांना पाठिशी न घालता कठोर कारवाई करावी,अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
मंडल अधिकारी संदिप मोरे हे भ्रष्टाचारी असून त्यांची खातेनिहाय चौकशी संख येथील अप्पर तहसिलदार प्रशांत पिसाळ यांच्याकडून करण्यात आली असून तसा चौकशी अहवाल संखचे अप्पर तहसीलदार श्री.पिसाळ यांनी येथील उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत आवटे यांच्याकडे पाठविण्यात येऊनही त्यांच्यावर आतापर्यंत का कारवाई करण्यात आली नाही याची ही चौकशी करावी व दोषी व भ्रष्ट मंडलअधिकारी यांना ताबडतोब बडतर्फ करावे,अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जत दोऱ्यावरील पालकमंत्री जयंत पाटील यांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी निवेदन दिले.